...मग फाशीची काय गरज?; निर्भया बलात्कारातील आरोपीने केला सुप्रीम कोर्टात अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:42 PM2019-12-11T12:42:46+5:302019-12-11T12:45:44+5:30

दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना दोषी मानल्यानंतर या आरोपीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आरोपी अक्षयने अनेक दावे केले आहेत. दिल्लीत हवा-पाणी यांच्या प्रदुषणामुळे लोकांचा मृत्यू होत असेल तर फाशीची गरज काय?

आरोपी अक्षयने केलेल्या याचिकेत लिहिलंय की, दिल्लीत हवा प्रदूषण सर्वाधिक धोकादायक स्तरावर आहे. लोकांचे जीवन गॅसवर आहे. अशामध्ये मृत्युदंडाची वेगळी शिक्षा देण्याची गरज काय? डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीत २३ वर्षीय निर्भयासोबत चालत्या बसमध्ये बलात्कार झाला होता.

आरोपी अक्षयने वेद पुराण आणि उपनिषद यांचांही उल्लेख केला आहे. वेद पुराणात लोक हजारो वर्ष जिवंत राहिल्याचा उल्लेख मिळत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पुनर्विचार याचिकेत सांगितले आहे की, दिल्लीत पाणीही प्रदुषित झालं आहे. प्रदुषित हवा, पाण्यामुळे लोकांचे वयोमान कमी होत चाललेत मग फाशी का दिली जात आहे?

कलयुगात माणसाचं वयोमान सरासरी ५० ते ६० वर्ष मर्यादित राहिलं आहे. फाशी देण्याची गरज नाही तोपर्यंत माणूस स्वत:चं मृत्यू पावतो.