अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 09:08 IST2026-05-06T09:06:23+5:302026-05-06T09:08:18+5:30
West Bengal Next CM: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अग्निमित्रा पॉल यांच्या नावाची जोरदार चर्चा. सुवेंदु अधिकारी यांना महिला कार्डमुळे मागे टाकणार का?

अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार...
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता सर्वांच्या नजरा "मुख्यमंत्री कोण होणार?" या प्रश्नाकडे लागल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बंगालमध्ये भाजपचा चेहरा असलेले आणि ममता बॅनर्जींचा पराभव करणारे सुवेंदु अधिकारी यांचे नाव आघाडीवर असतानाच, आता भाजपच्या फायरब्रांड नेत्या अग्निमित्रा पॉल यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या हायकमांडने त्यांना दिल्लीला बोलावल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
अग्निमित्रा पॉल यांच्या नावाची चर्चा का?
महिला सुरक्षा मुद्दा: भाजपले या निवडणुकीत महिला सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता. ममता बॅनर्जींसारख्या महिला नेत्याला टक्कर देण्यासाठी भाजप एखाद्या सक्षम महिला नेत्यालाच संधी देण्याची शक्यता आहे.
दिल्ली फॉर्म्युला: दिल्लीत ज्याप्रमाणे रेखा गुप्ता यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली, त्याच धर्तीवर बंगालमध्ये अग्निमित्रा पॉल यांना संधी दिली जाऊ शकते.
विक्रमी विजय: अग्निमित्रा यांनी आसनसोल दक्षिण मतदारसंघातून तृणमूलच्या तापस बॅनर्जी यांचा तब्बल ४० हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे. ही या निवडणुकीतील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक आहे.
हायकमांडचा विश्वास: पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सभांचे यशस्वी सूत्रसंचालन करून त्यांनी आपली संघटनात्मक पकड सिद्ध केली आहे.
कोण आहेत अग्निमित्रा पॉल?
राजकारणात येण्यापूर्वी अग्निमित्रा पॉल या एक यशस्वी फॅशन डिझायनर आणि बिझनेसवुमन होत्या. त्यांनी श्रीदेवी, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी काम केले आहे. २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी 'महिला मोर्चा'चे अध्यक्षपद भूषवले आणि राज्यभर स्वसंरक्षण कार्यशाळा आयोजित करून महिलांमध्ये आपली ओळख निर्माण केली.
शर्यतीत इतर नावेही कायम
सुवेंदु अधिकारी आणि अग्निमित्रा पॉल यांच्यासोबतच दिलीप घोष, शौमिक भट्टाचार्य आणि रूपा गांगुली यांची नावेही चर्चेत आहेत. मात्र, हायकमांड कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.