“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 21:10 IST2026-05-06T21:06:57+5:302026-05-06T21:10:06+5:30
Assam CM Himanta Biswa Sarma Big Statement On Congress: ज्याप्रमाणे तुम्ही पाहिले असेल की, आपले धुरंधर पाकिस्तानात कसे काम करत होते, तसेच आमचे धुरंधर काँग्रेसमध्ये आहेत, असे हेमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.

“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
Assam CM Himanta Biswa Sarma Big Statement On Congress: आसाममध्येभाजपा-एनडीएच्या सलग तिसऱ्या विजयानंतर हेमंत बिस्वा सरमा यांनी एक मोठा दावा केला आहे. आदित्य धर यांच्या अलीकडील ब्लॉकबस्टर 'धुरंधर' चित्रपटाचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. काँग्रेस पक्षात आमचे धुरंधर नेते आहेत. काँग्रेसचे ३० उमेदवार असे होते ज्यांचे भाजपासोबत चांगले संबंध होते. यापैकी सहा उमेदवार विजयी झालेले आहेत, असे सरमा यांनी म्हटले आहे.
१२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने १०२ जागा जिंकल्या असून, त्यापैकी ८२ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. भाजपाने एकूण ९० जागांवर निवडणूक लढवली होती. भाजपाचे मित्रपक्ष, आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी १० जागा जिंकल्या. भाजपा २०१६ पासून आसाममध्ये सत्तेवर असून, यावेळी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसमध्ये आपले अनेक हितचिंतक असून, त्यापैकी ६ जण निवडून आले आहेत, असा दावा केला आहे.
काँग्रेसचे अनेक नेते आम्हाला उघडपणे मदत करतात
हेमंत बिस्वा सरमा यांना विचारण्यात आले की, तुम्ही काँग्रेसमधून ३० उमेदवार देणार असल्याचा दावा केला होता, पण विरोधी पक्षाने यावेळी तुमच्या किती उमेदवारांना तिकिटे दिली. यावर उत्तर देताना सरमा यांनी सांगितले की, काँग्रेसने आमच्याशी चांगले संबंध असलेल्या ३० नेत्यांना तिकिटे दिली आणि त्यापैकी सहा जण जिंकले. काँग्रेसचे अनेक नेते आम्हाला मदत करतात. आम्हाला आमच्या शत्रूच्या गोटात काय सुरू आहे, हे पाहावे लागते, असे सरमा म्हणाले.
दरम्यान, ज्याप्रमाणे तुम्ही पाहिले असेल की आपले धुरंधर पाकिस्तानात कसे काम करत होते, तसेच आमचे धुरंधर काँग्रेसमध्ये आहेत. यावर, याचाच अर्थ हेमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसमध्ये त्यांचे हेर ठेवले आहेत का, असा सवाल करण्यात आला. यावर ते हेर नाहीत. त्यांची स्वतःची राजकीय कारकीर्द आहे. भाजपामध्ये होऊन ते निवडणुका जिंकणार नाहीत. त्यामुळे, काँग्रेसमध्येच राहूनच ते देशाची सेवा करत आहेत आणि भाजपाला मदतही करत आहेत, असे सरमा यांनी नमूद केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.