महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 22:09 IST2026-05-06T22:06:53+5:302026-05-06T22:09:09+5:30
Tamil Nadu Politics: अभिनेता विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी द्रमुक आणि एआयएडीएमके या दोन कट्टर विरोधी पक्षांमध्ये युती होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Tamil Nadu Politics: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात 'त्रिशंकू' स्थिती निर्माण झाली आहे. हा 'त्रिशंकू' चक्रव्यूह भेदून विजय यांना सत्ता स्थापन करावी लागणार आहे. यातच आता २०१९ ला जे महाराष्ट्रात घडले, तेच आता तामिळनाडूत होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
विजय यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत. तामिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांपैकी सरकार स्थापनेसाठी ११८ जागांचे बहुमत आवश्यक आहे. सरकार स्थापनेसाठी विजय यांना अजून ११ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. अभिनेता विजय यांनी अद्याप ११८ आमदारांचे पाठिंब्याचे पत्र सादर केलेले नाही. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ आपल्याकडे असल्याचे त्यांनी तोंडी सांगितले आहे. टीव्हीके यांनी १०७+५ म्हणजेच ११२ आमदारांच्या सह्या असलेले पत्र राज्यपालांना सादर केले होते. मात्र, राज्यपालांनी, कृपया ११८ सह्या (बहुमत) घेऊन परत या, असा प्रतिसाद दिला. यासाठी टीव्हीके यांनी काही वेळ मागितला आहे. यातच आता DMK आणि AIADMK एकत्र येणार का, याची चाचपणी सुरू झाल्याचा दावा केला जात आहे.
द्रमुक-एआयएडीएमके दोन कट्टर विरोधी पक्षांमध्ये युतीची चर्चा
तामिळनाडूमध्ये नवीन सरकार स्थापनेवरून राजकारण तीव्र झाले आहे. दरम्यान, द्रमुक आणि एआयएडीएमके या दोन कट्टर विरोधी पक्षांमध्ये युती होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हीसीकेने डीएमकेसोबत युती करून निवडणुका लढवल्या होत्या. व्हीसीके विजय यांच्यासोबत मिळून टीव्हीकेचे सरकार स्थापन करेल, अशी अटकळ होती. सत्तेत कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्यासाठी व्हीसीकेची बैठक होणार होती, पण आता डीएमके आणि एआयएडीएमके यांच्या युतीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर व्हीसीकेने ही बैठक रद्द केली आहे. यापूर्वी, टीव्हीकेने निमंत्रण देऊनही डाव्या पक्षांनी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने (आययूएमएल) पाठिंबा देण्यास नकार दिला होता.
बहुमताच्या आकड्यापेक्षा १२ जागांनी कमी
एआयएडीएमकेने विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. डीएमके आणि एआयएडीएमके यांच्या जागांची आकडेवारी पाहता, निवडणुकीत डीएमकेने ५९ जागा जिंकल्या, तर एआयएडीएमकेने ४७ जागा जिंकल्या. जर या दोन पक्षांनी युती केली, तर जागांची संख्या १०६ पर्यंत जाऊ शकते. परंतु, ११८ जागांच्या बहुमताच्या आकड्यापेक्षा ही संख्या १२ जागांनी कमी आहे. त्यामुळे, सरकार स्थापन करण्यासाठी या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना इतर पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागेल.
दरम्यान, टीव्हीकेला बहुमताचा आकडा काँग्रेस (५ जागा), व्हीसीके (२), सीपीआय (२) आणि सीपीआयएम (२) या पक्षांची आवश्यकता आहे. या सर्वांनी पाठिंबा दिल्यास टीव्हीकेचा आकडा नेमका ११८ वर पोहोचू शकतो. जर एखादा पक्ष थेट सत्तेत सामील होण्यास तयार नसेल, तर टीव्हीके त्यांना मंत्रिमंडळात न घेता केवळ विश्वासदर्शक ठरावावेळी 'बाहेरून पाठिंबा' देण्याची विनंती करू शकते. आता नेमके काय घडते, याकडे देशाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे.