मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 23:03 IST2026-05-06T22:59:09+5:302026-05-06T23:03:37+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण यमुना नदी ओलांडून दुसऱ्या बाजूला खरबूज खाण्यासाठी गेले होते. मात्र, परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.

प्रतिकात्मक फोटो...
उत्तर प्रदेश हमीरपूरमध्ये यमुना नदीत नाव उलटल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत नऊ जण नदीत बुडाले असून, त्यांपैकी तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अद्यापही सहा जण बेपत्ता असल्याचे समजते. त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण यमुना नदी ओलांडून दुसऱ्या बाजूला खरबूज खाण्यासाठी गेले होते. मात्र, परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.
फोनवर बोलत होता नाविक -
ही घटना कुरारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोतुपूर पटिया गावात घडली. श्रीपाल यांच्या मुलीचे मंगळवारी लग्न होते. बुधवारी मुलीच्या पाठवणीनंतर काही पाहुणे अथवा नातलग आनंदाच्या भरात नदीपलीकडे खरबूज खाण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या वेळी सर्व कार्यक्रम अटोपून परत असताना, नावाडी विष्णू याच्या मोबाईलवर फोन आला आणि ते बोलू लागले. याचवेळी नाविकाचे नावेवरील नियंत्रण सुटल्याने आणि लहान मुलांसह नऊ जण यमुनेच्या पात्रात बुडाले.
एनडीआरएफ घटनास्थळी शोध सुरू -
अपघातानंतर नावाडी विष्णू पोहून बाहेर आला, तर पारुल (१४) आणि रिंकू या दोन मुलींना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या दोघींनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय, उर्वरित दोन सख्या भावांसह सहा जण अद्यापही बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच एसडीएम अभिषेक कुमार, सीओ राजेश कमल आणि पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले आहे.
याशिवाय, एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.