अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 11:17 IST2026-05-06T11:15:14+5:302026-05-06T11:17:03+5:30
Iran War: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' संपल्याची घोषणा केली. स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये 'प्रोजेक्ट फ्रीडम' सुरू. वाचा सविस्तर वृत्त.

अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की?
गेल्या अनेक आठवड्यांपासून जगाचे लक्ष लागून राहिलेला अमेरिका आणि इराणमधील लष्करी संघर्ष आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अधिकृत घोषणा केली आहे की, २८ फेब्रुवारीपासून इस्रायलच्या सोबतीने सुरू केलेले 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' आता पूर्णपणे संपले आहे. या घोषणेमुळे जागतिक स्तरावर मोठा दिलासा व्यक्त केला जात आहे.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणमधील अनेक शहरांवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई आणि अनेक वरिष्ठ कमांडर मारले गेले होते. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला होता. सुमारे दीड महिना चाललेल्या या संघर्षानंतर ८ एप्रिलला युद्धविराम झाला होता.
'प्रोजेक्ट फ्रीडम' आणि होर्मुजची नाकेबंदी
युद्ध अधिकृतपणे संपले असले, तरी स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये तणाव कायम आहे. मार्को रुबियो यांनी सांगितले की, अमेरिकन नौदल आता 'प्रोजेक्ट फ्रीडम' अंतर्गत या महत्त्वाच्या समुद्री मार्गातील सुरुंग हटवण्यासाठी आणि जहाजांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी काम करत आहे. इराणकडून बेकायदेशीरपणे वसूल केला जाणारा 'टोल' थांबवण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असून, इराणने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ट्रम्प प्रशासनाची 'मॅक्सिमम प्रेशर' नीती
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर जास्तीत जास्त दबाव टाकण्याची नीती अवलंबली असून आर्थिक नाकेबंदी अधिक कडक केली आहे. अमेरिका चर्चेसाठी तयार असली, तरी इराणने प्रथम आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत ठोस आणि विश्वासार्ह पावले उचलावीत, अशी अट अमेरिकेने ठेवली आहे.
इराणचा पलटवार
दुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "एकीकडे अमेरिका चर्चेची भाषा करते आणि दुसरीकडे लष्करी कारवाया आणि धमक्या सुरू ठेवते, हे दुटप्पी धोरण आहे," असा आरोप त्यांनी केला आहे.