Navratri 2021: नवरात्रात दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा अन् पुण्य मिळवा; पाहा, नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 07:39 AM2021-10-10T07:39:19+5:302021-10-10T07:44:20+5:30

Shardiya Navratri 2021: धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही. यावर एक सोपा उपाय सांगितला गेला आहे, जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभू शकेल. जाणून घ्या...

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।। नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव. शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानला गेला आहे. (Navratri 2021)

नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसात नवदुर्गेच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी आपापाले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, पद्धती, परंपरा यांनुसार विशेष व्रताचरण केले जाते. यंदाच्या वर्षी ०७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. (know rules of durga saptashati reading)

देशभरात नवरात्रोत्सवाची मोठी धूम असते. मात्र, कोरोना संकटामुळे यंदाही उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या असल्या, तरी भाविकांच्या मनातील उत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही, असेच दिसून येत आहे. देवीच्या विविध श्लोक, मंत्र, पाठ यांमध्ये श्रीदुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. अनेक भविक नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण करतात. नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ पुण्यफलदायक मानले गेले आहे. (Shardiya Navratri 2021)

दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात. मात्र, धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही. तेव्हा काळजी करू नये. यावर एक सोपा उपाय सांगितला गेला आहे, जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभू शकेल. दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे. (rules of durga saptashati reading during navratri)

या ग्रंथात १३ अध्याय असून, तो तीन भागात विभागण्यात आला आहे. दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा, महती, महात्म्य आणि देवीच्या स्वरुपांविषयी वर्णन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधु कैटभ वधकथा, मध्यक्रमात महिषासुर संहार आणि उत्तरार्धात शुंभ-निशुंभ वध तसेच देवीकडून सुरथ आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

आजच्या काळातील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही. मात्र, यावर एक सोपा असून, कमी वेळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पूर्ण पुण्य मिळू शकते. सर्वप्रथम कवच, कीलक व अर्गला स्तोत्र म्हणावे. यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते.

एका पौराणिक कथेनुसार, महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले जाते. पुराणातील एका कथेनुसार, महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण पुण्य कसे मिळवावे, याबाबत सांगितले.

कुंजिका स्तोत्र पठण केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते. मात्र, कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्रांचा वापर कधीही कुणाचे अहित करण्यासाठी करू नये. अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते. कुंजिका स्तोत्रासह कवच, कीलक व अर्गला स्तोत्र म्हणावे. मात्र, नेमून दिलेल्या क्रमानेच पठण व्हावे, असे सांगितले जाते.

नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गा देवीचे शुभाशिर्वाद आणि कृपादृष्टी लाभते. अनेक संकटातून बाहेर पडण्यास यामुळे मोलाची मदत होते. दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात, असे सांगितले जाते.

दुर्गा सप्तशती पठणानंतर दान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. यथाशक्ती आणि यथासंभव दान करावे. असे केल्याने प्रत्येक कठीण टप्प्यावर देवीचे शुभाशिर्वाद, कृपा, पाठिंबा मिळतो, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.

नवरात्रात कवच, कीलक व अर्गला पठणानंतर कुंजिका स्तोत्र म्हणणे विशेष फलदायी मानले गेले आहे. यामुळे केवळ संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य प्राप्त होत नाही, तर आर्थिक समस्येतून मुक्तता मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

हितशत्रू, विरोधक नामोहरम होऊ शकतात. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकते, असे म्हटले जाते. तसेच याच्या पठणामुळे जीवनातील बहुतांश समस्या, अडचणी, आव्हाने, प्रश्न यांचे निराकरण शक्य होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.