विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:03 IST2026-05-04T16:01:33+5:302026-05-04T16:03:19+5:30
Tamil Nadu Election Results 2026 : कोलाथूर मतदारसंघातून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा पराभव. थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे व्ही. एस. बाबू यांनी केला पराभव.

विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालात आज भारतीय राजकारणाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि द्रमुक (DMK) प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचा त्यांच्या हक्काच्या कोलाथूर मतदारसंघातून पराभव झाला आहे. अभिनेता थलापती विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी स्टॅलिन यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.
स्टॅलिन यांच्या बालेकिल्ल्याला भगदाड
कोलाथूर हा स्टॅलिन यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या विजय यांच्या लाटेने मुख्यमंत्र्यांनाच घरचा रस्ता दाखवला आहे. व्ही. एस. बाबू यांनी सुरुवातीच्या फेरीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत स्टॅलिन यांना पराभूत केले. या पराभवामुळे द्रमुकच्या गोटात स्मशानशांतता पसरली असून, तामिळनाडूत नवीन राजकीय युगाची नांदी मानली जात आहे. स्टॅलिन यांचा सुमारे ८००० मतांनी पराभव झाला आहे.
विजय यांची 'किंगमेकर' ते 'किंग' अशी झेप
आपल्या पहिल्याच निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना पराभूत करण्याचे बळ दाखवत विजय यांच्या TVK पक्षाने तामिळनाडूच्या राजकारणात ५० वर्षांपासून असलेल्या प्रस्थापित द्रविडी पक्षांच्या DMK आणि AIADMK सत्तेला सुरुंग लावला आहे. स्टॅलिन यांचा पराभव हा केवळ एका जागेचा पराभव नसून, तो द्रमुकच्या विचारधारेला मिळालेला कौल असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
राज्यात राजकीय अस्थिरतेची शक्यता?
TVK बहुमताच्या जवळ असल्याने आणि स्वतः मुख्यमंत्री पराभूत झाल्याने, एम. के. स्टॅलिन यांना आता नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. टीव्हीके आणि काँग्रेसने सत्तास्थापनेची तयारी सुरु केली आहे. यास स्टॅलिन पाठिंबा देतात का, याकड़े सर्वांचे लक्ष लागले आहे. टीव्हीके सध्या १०५ जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी ११७ जागांची गरज आहे. यामुळे तामिळनाडूमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली असून राजकीय अस्थिरतेची शक्यता आहे.