जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:10 IST2026-05-04T16:04:42+5:302026-05-04T16:10:43+5:30
जबलपूरच्या बरगी डॅम क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू झाला. त्याच्या वडिलांनी रुग्णालयात केलेला आक्रोश पाहून सर्वांचे डोळे ओलावले.

जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
"बेटा उठ, बघ तुझे पप्पा आलेत... तुला माझ्या पाठीवर बसून घोडा-घोडा खेळायचं होतं ना? बघ आज मी घोडा बनलोय, तू एकदा तरी डोळे उघड आणि माझ्या पाठीवर बस..." हे शब्द आहेत एका हतबल बापाचे, ज्याने आपल्या ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह पांढऱ्या कफनात पाहिला. जबलपूरच्या बरगी डॅममध्ये झालेल्या क्रूझ अपघाताने १३ जणांचा बळी घेतला, पण ५ वर्षांच्या विराज आणि त्याच्या आईच्या मृत्यूने संपूर्ण देश सुन्न झाला आहे.
चार दिवसांनंतर सापडला विराजचा मृतदेह
सराफा कोतवाली येथील रहिवासी नीतू सोनी (४०) आणि त्यांचा मुलगा विराज हे या क्रूझवर होते. अपघाताच्या दिवशी नीतू यांचा मृतदेह सापडला होता, पण चिमुकला विराज लाटांमध्ये कुठेतरी हरवला होता. लष्कराच्या डीप डायव्हर्सनी चार दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर अखेर विराजचा निष्प्राण देह बाहेर काढला. जेव्हा विराजचा मृतदेह रुग्णालयात आणला गेला, तेव्हा त्याचे वडील कृष्णा सोनी तिथे उपस्थित होते. आपल्या काळजाच्या तुकड्याला अशा अवस्थेत पाहून कृष्णा यांनी शुद्ध हरपली आणि ते लेकाच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला उठवण्याची विनवणी करू लागले.
"मी तुझ्यासाठी घोडाही बनू शकलो नाही..."
विराजला नेहमी आपल्या वडिलांच्या पाठीवर बसून 'घोडा घोडा' खेळायला आवडायचे. तो वडिलांकडे नेहमी तसा हट्ट करायचा. हाच आठवण काढून कृष्णा सोनी रुग्णालयात मोठ्याने ओरडत होते, "मी तुझ्यासाठी घोडाही बनू शकलो नाही रे... आज मी घोडा बनलोय, तू एकदा तरी येऊन माझ्या पाठीवर बस." एका पित्याचा आपल्या मृत मुलाशी संवाद पाहून तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्या आणि पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आले.
क्रूझ कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा आरोप
नीतू सोनी यांच्या बहीण राखी सोनी या स्वतः त्या क्रूझवर होत्या. त्यांनी १० मिनिटांच्या त्या भयावह मृत्यूच्या तांडवाचा थरार सांगितला. "क्रूझवर चढताना सर्व काही ठीक होतं, पण अचानक वादळ आलं. कर्मचाऱ्यांनी आम्हाला लाईफ जॅकेट दिले नव्हते. जेव्हा पाणी क्रूझमध्ये शिरू लागलं, तेव्हा आम्हाला वाचवण्याऐवजी खालच्या केबिनमध्ये ढकललं गेलं. तिथेच सर्व लोक अडकले आणि गुदमरले," असा गंभीर आरोप राखी यांनी केला आहे. पुलाच्या कामासाठी असलेल्या मजुरांनी दोरखंड फेकले नसते, तर एकही प्रवासी वाचला नसता, असेही त्यांनी सांगितले.
संघर्षमय आयुष्याचा करुण शेवट
नीतू सोनी या गेल्या साडेचार वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळ्या राहून फायनान्स कंपनीत काम करत विराजचा सांभाळ करत होत्या. कुटुंबातील ७ लोक या सहलीला गेले होते, त्यापैकी ५ जण बचावले पण नीतू आणि विराजचा काळजाचा ठोका चुकला. अखेर विराजचा देह मिळाल्यानंतर, कृष्णा सोनी यांनीच आपल्या पत्नीला मुखाग्नी दिला आणि मुलावर अंत्यसंस्कार केले.