पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:44 IST2026-05-04T17:35:39+5:302026-05-04T17:44:28+5:30
उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला दारूत विष देऊन मारले. प्रियकरासाठी १० वर्षांचे नाते संपवून केले क्रूर कृत्य.

पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने क्रूरतेची सीमा ओलांडल्याची घटना उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये उघडकीस आली आहे. १० वर्षांचा सुखाचा संसार मोडून एका वर्षाच्या प्रेमासाठी पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला विष देऊन संपवले. धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह महामार्गावरील एका कालव्यात फेकून दिला. पोलिसांनी ८ दिवसांनंतर मृतदेह शोधून काढत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पार्टीचा बनाव आणि खुनाची योजना
मृत कुलवंत सिंह (३२) हा २५ एप्रिल रोजी पत्नी गुड्डीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेला होता. गुड्डीने आधीच आपला प्रियकर कपिल मौर्य याच्यासोबत मिळून कुलवंतच्या हत्येचा कट रचला होता. फ्लॅटवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तिथे गुड्डीने दारू आणि बिअर मागवून ठेवली होती. कुलवंत नशेत असताना, संधी साधून गुड्डी आणि कपिलने त्याच्या दारूमध्ये गुपचूप सल्फासच्या गोळ्या मिसळल्या. विषारी दारू पिताच कुलवंतचा तिथेच तडफडून मृत्यू झाला.
असा विल्हेवाट लावला मृतदेहाचा
पतीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर गुड्डी आणि कपिलने त्याचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि महामार्गावरील बायपास पुलाजवळ असलेल्या एका कालव्यात फेकून दिला. कुलवंत घरी न परतल्याने त्याच्या आईने १ मे रोजी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. कुलवंत २५ एप्रिलला पत्नीला भेटायला गेला होता, ही एकमेव माहिती पोलिसांच्या हाती होती.
अवैध संबंधातून घात
तपास सुरू असताना पोलिसांना गुड्डी आणि कपिल मौर्य यांच्यातील अवैध संबंधांची कुणकुण लागली. संशयाच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कडक चौकशी केली असता, गुड्डीने आपला गुन्हा कबूल केला. "पती नशेत मला मारहाण करायचा, त्यामुळे आम्ही त्याला संपवले," असे तिने पोलिसांना सांगितले. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती कुलवंतला मिळाली होती आणि त्यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. याच रागातून कुलवंतची हत्या करण्यात आली. पोलिसांनी एसडीआरएफच्या मदतीने ८ दिवसांनंतर कालव्यातून कुलवंतचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून न्यायालयाने दोन्ही आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे.