CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:06 IST2026-05-04T18:04:39+5:302026-05-04T18:06:09+5:30
CM Devendra Fadnavis First Reaction On West Bengal Election 2026 Result: पश्चिम बंगालचा विजय हा भारतात होणारी घुसखोरी, भारतावर होणारे हल्ले यापासून वाचवणारा विजय आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
CM Devendra Fadnavis First Reaction On West Bengal Election 2026 Result: देशातील जनतेला एकच गोष्टी माहिती आहे की, ‘मोदी है तो मुमकिन है’. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचे काम जनतेने केले आहे. ३० वर्षे काँग्रेस, ३६ वर्षे कम्युनिस्ट आणि या दोघांपेक्षा भयंकर ममता बॅनर्जी यांचे शासन होते. पश्चिम बंगाल देशातील पहिले औद्योगिक राज्य होते. सात हजार उद्योग तिथून सोडून गेले. पश्चिम बंगालची अवस्था जंगलराज झाली होती. पण पंतप्रधान मोदी यांनी जे व्हिजन मांडले, जो आशेचा किरण दाखवला त्यावर लोकांनी विश्वास दाखवला. जनतेला हा विश्वास बसला की पश्चिम बंगालचे परिवर्तन कुणी करू शकते, तर त्या व्यक्तीचे नाव नरेंद्र मोदी हेच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. २९३ जागांपैकी एकूण २०२ जागांवर भाजपा आघाडीवर असून, २१ जागी भाजपा उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष एकूण ८५ जागांवर आघाडीवर असून, ८ जागांवर तृणमूलचे उमेदवार विजयी झाले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, देशभरात विजयोत्सव साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुंबई मुख्यालयात जल्लोष केला.
पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन नाही, तर महापरिवर्तन झाले
हा दिवस सगळ्यांसाठी ऐतिहासिक आहे. पश्चिम बंगालमध्ये गेलो होतो, तेव्हा पत्रकार परिषदेत तिथल्या एका पत्रकाराने विचारले होते की, ममतादीदी म्हणतात भाजपा आणि त्यांचे नेते बंगालच्या बाहेरचे आहेत. बाहेरचे लोक मते मागतात. मी पत्रकारांना सांगितले की, भाजपाची स्थापना ज्यांनी केली, ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच पश्चिम बंगालचे होते, त्यामुळे खऱ्या पश्चिम बंगालचा पक्ष कोणता असेल, तर तो भारतीय जनता पक्ष आहे. पश्चिम बंगलाच्या जनतेने ममता दीदींना दाखवून दिले की, पश्चिम बंगालचा खरा पक्ष कोणता आहे. पश्चिम बंगालच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन नुसते परिवर्तन नाही, तर महापरिवर्तन करून दाखवले. ते इतके आहे की, दोन तृतीयांश संख्याबळ भाजपाला मिळते आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींवरचा विश्वास जनतेने मतपेटीतून दाखवला आहे. आपले मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि आधुनिक राजकारणातील चाणक्य अमित शाह यांनी ज्या प्रकारे योजना तयार केली आणि आपले नेतृत्व काय आहे, ते दाखवून दिले. तसेच आपले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, नेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह मी सगळ्यांचे अभिनंदन करतो. पश्चिम बंगलचा विजय हा केवळ एका राज्याचा विजय नाही. पश्चिम बंगालचा विजय हा भारतात होणारी घुसखोरी, भारतावर होणारे हल्ले यापासून भारताला वाचवणारा विजय आहे, असेही फडणवीस म्हणाले.