हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 07:24 IST2026-05-05T06:58:32+5:302026-05-05T07:24:30+5:30
भाजपच्या येथील प्रदेश कार्यालयात बंगालसह भाजपला मिळालेल्या यशाचा जल्लोष गुलाल उधळून व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. चित्रा वाघ आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळालेले दोन तृतीयांश यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर तेथील जनतेने दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. हा केवळ एका राज्याचा नव्हे, तर घुसखोरी, दहशतवादी कारवाया यापासून भारताला वाचविणारा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
भाजपच्या येथील प्रदेश कार्यालयात बंगालसह भाजपला मिळालेल्या यशाचा जल्लोष गुलाल उधळून व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. चित्रा वाघ आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
जनतेने महापरिवर्तन करून दाखविले
फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून बंगालमध्ये जनतेने महापरिवर्तन करून दाखविले. बंगाल, आसाम, पुदुच्चेरीमधील विजय हा जनतेचा पंतप्रधान मोदींवर असणाऱ्या विश्वासाचा विजय आहे. आधी ३० वर्षे काँग्रेस, ३६ वर्षे कम्युनिस्ट आणि त्यापेक्षाही खतरनाक ममतादीदींचे १५ वर्षांचे कुशासन होते.
देशाच्या एफडीआयमधील अर्धा टक्काही बंगालमध्ये येत नाही. सात हजार उद्योग राज्याबाहेर गेले, लोकांना हे सगळे बदलायचे होते,
त्यांनी मोदी यांच्यावर विश्वास टाकला
या राज्याने मोदींच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास टाकला. राजकारणातले चाणक्य गृहमंत्री अमित शाह यांनी चोख योजना केली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पक्षनेतृत्वाची सुरुवात विजयाने झाली, असे फडणवीस म्हणाले.
आता खापर ‘ईव्हीएम’वर!
आता ममतादीदी ‘ईव्हीएम’वर खापर फोडतील. केरळमध्ये ईव्हीएम व्यवस्थित चालतात; पण, बंगालमध्ये बदलतात. हा विजय त्या सगळ्यांना उत्तर आहे, ज्यांनी देशातील संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, संसद चुकीचे आहे म्हणणाऱ्यांना हे योग्य प्रत्युत्तर आहे.
बंगाल, आसाम, पुदुच्चेरीमधील विजय हा जनतेचा पंतप्रधान मोदींवर असणाऱ्या विश्वासाचा विजय आहे. जनतेला आता एकच गोष्ट माहिती आहे “मोदी है तो मुमकीन है” असे मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीस यांच्या हस्ते पक्षाच्या सहा विधान परिषद सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.