शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 05:22 IST2026-05-05T05:21:44+5:302026-05-05T05:22:38+5:30
या कथेतील एक प्रमुख पात्र नरेंद्र मोदी हे आहेत. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात प. बंगाल ममता दीदींच्या प्रभावातून हिसकावून घ्यायचा, असा चंग भाजपने बांधला होता आणि त्यासाठी त्यांनी मोदी ब्रँड कुशलतेने वापरला आणि बंगाली जनतेने तो स्वीकारला, असे म्हणता येईल.

शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
कोलकाता/नवी दिल्ली : ‘बिहारमध्ये मिळालेला हा कौल केवळ तिथल्या विजयाची कहाणी नाही, तर तो देशभरातील आगामी विजयाची नांदी आहे. पाटण्यातील गंगेच्या किनाऱ्यावरून सुरू झालेली ही विजयाची धारा आता बंगालच्या उपसागरापर्यंत (कोलकाता) पोहोचवायची आहे.’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकांमधील एनडीएच्या नेत्रदीपक विजयाच्या भाषणात केले होते. आणि ४ मे २०२६ रोजी भाजपने प. बंगालमध्ये अखेर विजयाचा झेंडा रोवला. बंगालमध्ये भाजपची ही कामगिरी केवळ एका विजयाची कथा नसून ती पूर्व भारतातील राजकारणाची दिशा बदलणारी घटना आहे. या कथेतील एक प्रमुख पात्र नरेंद्र मोदी हे आहेत. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात प. बंगाल ममता दीदींच्या प्रभावातून हिसकावून घ्यायचा, असा चंग भाजपने बांधला होता आणि त्यासाठी त्यांनी मोदी ब्रँड कुशलतेने वापरला आणि बंगाली जनतेने तो स्वीकारला, असे म्हणता येईल.
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
उत्तर २४ परगणा : सर्वाधिक ४ वेळा भेट देऊन त्यांनी मतुआ समुदायाला साद घातली. कोलकाता, दक्षिण २४ परगणा : २०२१ मध्ये जिथे भाजपचे खातेही उघडले नव्हते, तिथे मोदींनी ठनठनिया कालीबाड़ी दर्शन आणि ‘भवानीपूर’मधील सभांद्वारे तृणमूलच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले.
ममता बॅनर्जी यांच्या मौनावर प्रश्न केले उपस्थित मोदींनी आपल्या सर्व भाषणांत महिला सुरक्षेवर भर दिला. संदेशखालीत महिलांचे झालेले लैंगिक शोषण आणि आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर झालेले अत्याचार व हत्येचा मुद्दा प्रचारात लावून धरत ममता बॅनर्जी यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले. ममतांच्या राज्यात महिला कशा असुरक्षित आहेत हे त्यांनी मतदारांना पटवून दिले.
‘बाहेरचा’ विरुद्ध ‘अभिभावक’
ममता बॅनर्जींच्या ‘बाहेरचा व्यक्ती’ या नॅरेटिव्हला मोदींनी अत्यंत चतुराईने उत्तर दिले. बंगाली भाषेत पत्र लिहिणे, हुगळीच्या नाविकांची भेट घेणे आणि स्थानिक मंदिरांत पूजा करणे, यातून त्यांनी स्वतःला बंगालचा ‘अभिभावक’ (पालक) म्हणून सादर केले. सर्वसामान्य बंगालीची आवडती झालमुरी खाणे यातून जनतेशी त्यांचा थेट संवाद दिसून आला आणि ‘पाल्टानो दोरकार, चाई बीजेपी सरकार’ (बदल हवा आहे, भाजप सरकार हवे आहे) हा त्यांचा नारा बंगालच्या युवकांच्या मनावर राज्य करून गेला.
जनतेच्या प्रश्नांची मांडणी
आपल्या सभांमध्ये मोदींनी प्रामुख्याने संदेशखाली येथील हिंसाचार, भ्रष्टाचार आणि टीएमसीचे ‘सिंडिकेट राज’ यावर जोरदार टीका केली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बंगालच्या जनतेला उद्देशून पत्रात मोदींनी बंगालच्या विकासाचा रोडमॅप मांडला आणि ‘भय खूप झाले, आता विकास हवा’, असा संदेश दिला होता.
झालमुरीने विरोधकांची शिकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल दौऱ्यात ज्या भागात १० रुपयांच्या झालमुरीचा आस्वाद घेतला त्या भागातील झारग्राम, बिनपूर, गोपनीबल्लभपूर आणि नयाग्राम या चारही जागांवर भाजपने आघाडी घेतली.
भाजपला मिळालेली मते
२०२१ ३८.१४%
२०१६ १६.००%
२०११ ६.५२%
२००६ १.९३%
२००१ ५.१९%
१९९६ ६.४५%