भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
By प्रविण मरगळे | Updated: May 5, 2026 08:24 IST2026-05-05T08:19:15+5:302026-05-05T08:24:19+5:30
ज्या कलिता माझी यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी अथवा आर्थिक पाठबळ नाही त्यांनी बड्या प्रस्थापित पक्षातील नेत्यांना पराभवाची धूळ चारली.

भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
कोलकाता - पश्चिम बंगालच्या राजकारणात यावेळी अशी कहाणी समोर आली आहे जी फक्त जय पराजय नाही तर त्याहून पुढे जात संघर्ष, अपेक्षा आणि परिवर्तनाचे मोठे उदाहरण बनली आहे. भाजपाच्या कलिता माझी यांनी तृणमूल काँग्रेसच्या श्यामा प्रसन्न लोहार यांना हरवून औसाग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. कलिता माझी यांनी श्यामा प्रसन्न यांना १२ हजार ५३५ मताधिक्यांनी पराभूत केले आहे.
कलिता माझी यांना एकूण १ लाख ७ हजार ६९२ मते मिळाली आहेत तर श्यामा प्रसन्न यांना ९५ हजार १५७ मतांवर समाधान मानावे लागले आहे. त्याशिवाय सीपीआयचे चंचल कुमार यांना १६ हजार ४७८ मते पडली. कलिता माझी यांची कहाणी सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. कलिता माझी यांना कुठलाही मोठा राजकीय वारसा नाही. निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत. कलिता माझी या भाजपाच्या अशा उमेदवार होत्या, ज्या ४ घरांमध्ये घरकाम म्हणून काम करून महिन्याला २५०० हजार रुपये कमवायच्या. याच कलिता माझी यांना भाजपाने विधानसभेची संधी दिली आणि त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली.
कलिता माझी या औसाग्राम मतदारसंघातून आमदार बनल्या आहेत. ही भाजपाची ताकद आहे. जिथे एका सर्वसामान्य माणसाला पुढे जाता येऊ शकते. ही खरोखरच एक प्रेरणादायी कहाणी आहे असं भाजपा खासदार पी.सी मोहन यांनी म्हटलं आहे. ओसाग्राम मतदारसंघातून निवडून आलेल्या कलिता माझी यांच्या विजयाने लोकशाहीत सामान्य माणसांच्या मतांची ताकद काय असते हे सिद्ध करून दाखवले आहे. ज्या कलिता माझी यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी अथवा आर्थिक पाठबळ नाही त्यांनी बड्या प्रस्थापित पक्षातील नेत्यांना पराभवाची धूळ चारली. घरकाम करून महिन्याला २५०० रुपये कमावणाऱ्या कलिता माझी यांचा हा प्रवास सोपा नव्हता.
कलिता यांना २०२१ च्या निवडणुकीतही भाजपाने उमेदवारी दिली होती परंतु त्यावेळी विरोधी पक्ष टीएमसी उमेदवाराकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतरही भाजपाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आणि हा विश्वास खरा ठरवत कलिता माझी आमदार बनल्या. निवडणूक प्रचारात कलिता माझी घरोघरी जात लोकांशी संपर्क ठेवत होत्या. त्याचा निकाल आता लोकांसमोर आला आहे. रोजच्या आयुष्याशी लढणाऱ्या कलिता माझी यांनी कधीही त्या एक दिवस विधानसभेत जातील याची कल्पनाही केली नव्हती. मात्र त्यांच्या विजयाने हे स्वप्न सत्यात उतरवले आहे.