नीतीश कुमार भाजपासोबत आल्यास दोघांनाही फायदा; बिहारचं राजकीय गणित समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 09:09 PM2024-01-27T21:09:19+5:302024-01-27T21:13:38+5:30

बिहारमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्य अद्याप संपलेले नाही. एका बाजूला नीतीश कुमारांचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला लालू यादव आणि तेजस्वी यादव. येत्या काही तासांत किंवा रविवारी नीतीशकुमार राजीनामा देण्यासारखे मोठे पाऊल उचलू शकतात, असे बोलले जात आहे. परंतु आतापर्यंत केवळ बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत

जेडीयू, आरजेडीपासून भाजपापर्यंतचे बडे नेते बैठकांमध्ये व्यस्त आहेत. नीतीश कुमार एनडीएमध्ये परतले तर ते भाजपा आणि जेडीयू दोघांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे मानले जात आहे. त्यामुळेच आतापर्यंत गप्प बसलेल्या भाजपाने अचानक नीतीश कुमारांबाबतची त्यांची भूमिका मवाळ केल्याचे बोलले जाते

बिहारमध्ये नीतीशकुमार एनडीएसोबत आले तर त्याचा मोठा राजकीय फायदाही होऊ शकतो, हे कुठेतरी भाजपलाही कळून चुकले आहे. भाजपाचे लक्ष सध्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. भाजपाने ४०० चा आकडा पार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यूपी-बिहारशिवाय ४०० चे टार्गेट शक्य नाही हे भाजपाला चांगलेच ठाऊक आहे.

बिहारमध्ये कोणताही मोठा चेहरा नसल्याने नीतीश यांचे एकत्र येणे भाजपासाठीही फायदेशीर मानले जात आहे. अशा स्थितीत नीतीश कुमार एनडीएमध्ये परतले तर त्यांना बिहारमधील एका मोठ्या नेत्याचा पाठिंबा मिळेल आणि आरजेडीसह इतर विरोधी पक्षांनाही ते तगडे आव्हान देऊ शकतात.

लालू यादव हे बिहारमध्ये प्रचंड जनाधार असलेले नेते आहेत. तेजस्वी यादवही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. त्यामुळे नीतीश यांना एनडीएमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय भाजपासाठी फायदेशीर ठरू शकतो.

दुसरीकडे, जेडीयू एनडीएचा भाग झाला तर त्याचा फायदा नीतीश कुमारांनाही होईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयू एनडीएचा भाग होता. तेव्हा एनडीए आघाडीने बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. पक्षनिहाय पाहिले तर भाजपाने १७ जागा जिंकल्या होत्या, जेडीयूने १६, लोक जनशक्ती पक्षाने ६ आणि काँग्रेसने एक जागा जिंकली होती.

सध्या इंडिया आघाडीत जागावाटपावरून पेच आहे. जागावाटप लवकरात लवकर व्हावे, असे नीतीश कुमार यांनी अनेकवेळा सांगितले, पण त्यांच्या शब्दांना महत्त्व दिले गेले नाही. अशा स्थितीत बिहारचा क्रमांक एकचा पक्ष आरजेडी जास्तीत जास्त जागांची मागणी करू शकतो याचीही जाणीव नीतीश कुमारांना आहे.

याचा स्पष्ट अर्थ नीतीश कुमार यांना NDA मध्ये असताना लोकसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. यामध्ये जातीवर आधारित जनगणना हे त्यांच्यासाठी मोठे शस्त्र ठरू शकते. जर ते एनडीएमध्ये सामील झाले तर ते अयोध्येतील राम मंदिराच्या माध्यमातून हिंदुत्व मतदारांनाही आपल्याकडे वळवू शकतात. अशा स्थितीत नीतीश कुमार एनडीएसोबत गेल्यास लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्यांचे नगण्य नुकसान होण्याची शक्यता आहे असे मानले जात आहे.

नीतीशकुमार एनडीएचा भाग झाले तर बिहार विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या सरकारला कोणताही धोका दिसत नाही. दरम्यान, भाजपाने लोकसभा निवडणूक जिंकली तरी नीतीश कुमारांसाठी तो प्लस पॉइंट असेल.

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने JDU पेक्षा पुढे जाऊन मुख्यमंत्रीपदावर आपला दावा मांडला, तर नीतीश कुमार केंद्रीय राजकारणात मोठ्या पदावर जाण्याची इच्छा व्यक्त करू शकतात.