‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 10:21 IST2026-05-02T10:21:20+5:302026-05-02T10:21:54+5:30
कालिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये व्हिसेरा नमुने पाठविण्यात आले आहेत. या लॅबमधून लवकरात लवकर माहिती मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
मुंबई - पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. जेजे रुग्णालयात या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघांपैकी एका व्यक्तीच्या शरीरातील अवयवाचा रंग हिरवट झाल्याचे आढळले. मात्र, अन्य तिघांच्या बाबतीत असे दिसले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी या चौघांचे मृतदेह कालिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले. त्याचा अहवाल सोमवारी येण्याची शक्यता असून, त्यानंतर खरे कारण समोर येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विविध चर्चा सुरू आहे. कलिंगड खाल्ल्याने अशा पद्धतीने मृत्यू होतो का? याचे उत्तर शोधण्यासाठी पोलिस विविध गोष्टींची चाचपणी करीत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेची मदत घेण्यात येत आहे. तसेच कालिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये व्हिसेरा नमुने पाठविण्यात आले आहेत. या लॅबमधून लवकरात लवकर माहिती मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, सर्वसाधारण अन्न विषबाधेतून मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असते. या प्रकरणात काही तरी वेगळे कारण असण्याची शक्यता आहे.
‘त्या’ दिवशी काय घडले?
२५ एप्रिल रोजी पायधुनीतील डोकाडिया कुटुंबाने रात्री कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर काही वेळातच कुटुंबातील चौघांनाही उलट्या व तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. २६ एप्रिलला प्रकृती खालावल्याने दोन्ही मुली बेशुद्ध पडल्या. त्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान दोन्ही मुली आणि पालकांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू कलिंगडामुळे झालेल्या विषबाधेतून झाल्याचा प्राथमिक अंदाज होता.