'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 19:34 IST2026-05-03T19:30:50+5:302026-05-03T19:34:21+5:30
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी आधीच गदारोळ सुरू झाला आहे. ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या भवानीपूरमध्ये भाजपाचा झेंडा असलेल्या गाड्या स्ट्राँग रुमजवळ दिसल्या.

'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
देशाचे लक्ष असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी आधी राजकीय गदारोळ सुरू झाला. ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या भवानीपूर मतदारसंघात हा गोंधळ झाला असून, तृणमूल काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे. ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुममध्ये जाण्याची दोन कारला परवानगी देण्यात आली. या दोन्ही कारला भाजपाचा झेंडा लावलेला होता, असे तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे.
सखावत मेमोरियल गर्ल्स स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. यापूर्वी गुरूवारी रात्री ममता बॅनर्जी यांनी याच शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. स्ट्राँग रुममध्ये काही लोक परवानगी नसताना घुसले असा आरोप त्यांनी केला होता.
'भाजपाचा झेंडा असलेल्या दोन कार स्ट्राँग रुममध्ये गेल्या'
४ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते सगळ्या स्ट्राँग रुमवर लक्ष ठेवून आहेत. ममता बॅनर्जी यांच्याकडून सातत्याने मतमोजणी घोळ आणि ईव्हीएमसोबत छेडछाड केली जाऊ शकते, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातच ही घटना घडली.
मतमोजणी केंद्रापासून १०० मीटर अंतरावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा तंबू आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरोप केला की, दोन कार आतमध्ये घुसल्या आणि स्ट्राँग रुमजवळ गेल्या.
"CAPFचे लोक कोणत्याही वैध ओळखपत्राशिवाय कोणत्याही व्यक्तीला किंवा वाहनाला मतमोजणी केंद्राच्या आत जाऊ देत नाहीत. मग या कार, ज्या मागील काही दिवसांत कधीही दिसल्या नाहीत, त्यांना आत प्रवेश कसा दिला गेला? आम्ही जेव्हा विरोध केला, तेव्हा आम्हाला १०० मीटर दूर जाण्यास सांगितले", असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केला.
निवडणूक आयोगाने काय म्हटलेय?
तृणमूल काँग्रेसने केलेल्या आरोपावर खुलासा करताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "कार हरीश मुखर्जी रोडवरून जात होती. सुरक्षा पथक आणि पोलिसांनी गाडीची तपासणी केली. त्यात काहीही आक्षेपार्ह आढळून न आल्यानंतर सोडण्यात आले.
पश्चिम बंगालमसह चार राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशातील विधान निवडणुकीचे निकाल सोमवारी ४ मे रोजी जाहीर होणार आहेत. यात सर्वाधिक लक्ष हे पश्चिम बंगालकडे आहे. कारण तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा यांच्यात लढाई होत आहे. भाजपाने पश्चिम बंगालची सत्ता मिळवण्यासाठी निवडणुकीत झोकून दिले. त्यामुळे भाजपाची कामगिरी कशी राहणार, यासाठी हे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत.