निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 20:49 IST2026-05-03T20:42:16+5:302026-05-03T20:49:40+5:30
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नोआपारा येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास भाजपचे संघटनात्मक जिल्हा सचिव कुंदन सिंह यांच्या घरावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, या गोळीबारात कोणतीही जीवीत हाणी झालेली नाही.

निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काहीच तास शिल्लक आहेत. मात्र, त्यापूर्वी, काही समाजकंटकांकडून राज्यात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात सोमवारी (४ मे) विधानसभेच्या २९३ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नोआपारा येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास भाजपचे संघटनात्मक जिल्हा सचिव कुंदन सिंह यांच्या घरावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, या गोळीबारात कोणतीही जीवीत हाणी झालेली नाही.
घटना सीसीटीव्हीत कैद -
सध्या पश्चिम बंगालमध्ये मोठा मोठा सुरक्षा बंदोबस्त आहे. भाजप नेते कुंदन सिंह म्हणाले, आकाश चौधरी आणि अमन नावाच्या दोन हल्लेखोरांनी हा हल्ला केला. त्यांनी आपल्या घराबाहेर येऊन अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या हल्ल्यानंतर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. दरम्यान, "तृणमूल काँग्रेस ही निवडणूक हरली आहे. यामुळेच भाजप कार्यकर्त्यांना घाबरवण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत," असा आरोपही कुंदन सिंह यांनी केला.
हेही वाचा - "रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
या प्रकरणी नोआपारा येथील भाजप उमेदवार आणि माजी खासदार अर्जुन सिंह यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. पोलीस भाजप कार्यकर्त्यांना संरक्षण देत नाहीयेत. हे दोन्ही आरोपी अंमली पदार्थांच्या तस्करीत सामील असून, पोलिसांकडे व्हिडिओ पुरावे असतानाही सुरुवातीला कारवाई करण्यात आली नाही. असा दावाही त्यांनी केला.
काय म्हणाले पोलीस? -
दरम्यान, या घटनेवर बॅरकपूर पोलीस आयुक्तालयाने प्रतिक्रिया दिली असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याचे डीसी (उत्तर) वाशिम खान यांनी म्हटले आहे. त्यांना बॅरकपूर न्यायालयात हजर केले जाणार आहे. मतमोजणीपूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.