तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:07 IST2026-05-02T12:02:16+5:302026-05-02T12:07:58+5:30
Extremely Severe Alert: केंद्र सरकारच्या सेल ब्रॉडकास्टची यशस्वी चाचणी, भारताने सज्ज केली स्वदेशी Extremely Severe Alert सिस्टिम. ही पूर्णपणे मेड इन इंडिया प्रणाली असून ती सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सने विकसित केली आहे. सामान्य मेसेजपेक्षा ही यंत्रणा वेगळी आहे.

तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
Extremely Severe Alert: शनिवारी २ मे रोजी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मुंबईसह देशभरातील लाखो नागरिकांच्या मोबाईलवर अचानक एक जोरात सायरन वाजला आणि स्क्रीनवर इमर्जन्सी अलर्टचा मेसेज आला. अचानक झालेल्या या आवाजामुळे आणि मोबाईल व्हायब्रेट झाल्यामुळे सुरुवातीला नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा कोणताही धोका नसून केंद्र सरकारकडून करण्यात आलेली एक महत्त्वाची तांत्रिक चाचणी होती आणि याला सेल ब्रॉडकास्ट असे म्हणतात.
भारत सरकारच्या दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टमची चाचणी घेण्यात आली. नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर, चक्रीवादळ किंवा मानवनिर्मित संकटांच्या वेळी नागरिकांना तात्काळ सतर्क करण्यासाठी ही सिस्टिम तयार करण्यात आली आहे.
ही पूर्णपणे मेड इन इंडिया प्रणाली असून ती सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सने विकसित केली आहे. सामान्य मेसेजपेक्षा ही यंत्रणा वेगळी आहे. आपत्तीच्या काळात फोन लाईन्स जाम असल्या तरीही ही प्रणाली एकाच वेळी ठराविक क्षेत्रातील सर्व मोबाईलवर मेसेज पाठवू शकते. हा संपूर्ण प्रकल्प साचत या अलर्ट प्लॅटफॉर्मचा भाग आहे.
नागरिकांना घाबरण्याची गरज नाही
सरकारने स्पष्ट केले की, हा केवळ एक टेस्ट मेसेज होता. हा मेसेज मिळाल्यावर जनतेने घाबरून जाण्याची किंवा कोणतीही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. यंत्रणेची विश्वासार्हता तपासण्यासाठी हे मेसेज इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये पाठवले जात आहेत.
नेमका मेसेज काय होता?
“भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकतानाही. हा एक चाचणी संदेश आहे – भारत सरकार” असं मेसेजमध्ये म्हटलं.
एकापेक्षा जास्त वेळा अलर्ट का येतो?
वेगवेगळ्या मोबाईल टॉवर्सची आणि नेटवर्कची क्षमता तपासली जात असल्याने, काही युजर्सना हा अलर्ट एकापेक्षा जास्त वेळा मिळू शकतो. हे पूर्णपणे सामान्य असून ही यंत्रणा योग्यरित्या काम करतेय की नाही हे तपासण्यासाठी आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
"नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा" या ब्रीदवाक्यासह सुरू झालेली ही सेवा भविष्यात मोठ्या आपत्तीच्या वेळी हजारो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. एकदा का या चाचण्या पूर्ण झाल्या की, ही यंत्रणा ऑटोमॅटिकली काम करण्यास सुरुवात करेल. ज्यांच्या मोबाईलमध्ये सेल ब्रॉडकास्ट टेस्ट अलर्ट सुरू असेल त्यांनाच हे मेसेज मिळतील. फोनच्या Settings > Safety and Emergency > Wireless Emergency Alerts > Test Alerts मध्ये जाऊन ही सेवा सुरु करता येऊ शकते.