Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 13:37 IST2026-05-02T11:49:21+5:302026-05-02T13:37:14+5:30
उद्घाटनाचा दुसऱ्याच दिवशी पुन्हा ही लिंक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अभिजीत पानसे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी बहुचर्चित 'मिसिंग लिंक' चा कालच मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते उद्घाटन झाले. मात्र, उद्घाटनाचा दुसऱ्याच दिवशी पुन्हा ही लिंक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अभिजीत पानसे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
पुण्याहून मुंबईकडे येत असताना लोणावळ्याजवळ झालेल्या वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर पानसे यांनी संताप व्यक्त केला. व्हिडिओमध्ये ते म्हणाले, "मी सध्या घाटात अडकलो आहे. मला इथे जवळपास एखादं पोलीस स्टेशन कुठे आहे, हे कोणी सांगू शकेल का? कारण मला 'मिसिंग लिंक'चा मिसिंग रिपोर्ट द्यायचा आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी या लिंकचे उद्घाटन केले आणि आज ती पुन्हा बंद आहे. पुन्हा एकदा घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे."
प्रचंड गाजावाजा करून सुरू झालेली ही लिंक दुसऱ्याच दिवशी बंद का ठेवली, असा प्रश्न आता सर्वसामान्य प्रवाशांकडून विचारला जात आहे. फक्त प्रसिद्धीसाठी घाईघाईत उद्घाटन उरकले का? असा सवालही पानसे यांनी आपल्या उपरोधिक टोल्यातून उपस्थित केला आहे. 'मिसिंग लिंक' सुरू झाल्याने घाटातील वाहतूक कोंडी सुटणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता, मात्र पहिल्याच दिवशी प्रवाशांना जुन्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नेहमीप्रमाणे लोणावळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मिसिंग लिंक सुरू झाल्याच्या आशेने अनेक प्रवाशांनी हा मार्ग निवडला, मात्र लिंक बंद असल्याने सर्व गाड्या पुन्हा जुन्या वळणांवर अडकून पडल्या आहेत. यामुळे कडाक्याच्या उन्हात प्रवाशांचे हाल होत आहेत.
अभिजीत पानसे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पुणे-मुंबई मार्गिकेवर लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी मंडप घालण्यात आला होता. या मंडप काढून मार्गिका रिकामी करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता एमएसआरडीसी आणि वाहतूक पोलिसांनी सायंकाळी ६ पर्यंत मार्गिका खुली केली जाईल असे सांगितले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मार्गिका खुली झालीच नाही, पण शनिवार उजाडला तरी प्रवाशांना, वाहनचालकांना मार्गिका खुली होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नाराजी वाढत आहे.