लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी सत्ताधाऱ्यांनी शेअर बाजारातून बक्कळ पैसे मिळणार असल्याची घोषणाच केली होती. तसे झालेही. आता भाजपाच्या हाती कधीच न लागलेल्या तीन राज्यांमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. यापैकी महत्वाचे असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मोठे सत्तांतर होण्याचे संकेत एक्झिट पोलनी दिले आहेत. यामुळे या दिवशी देखील शेअर बाजारात त्सुनामी येणार या आशेवर अनेक गुंतवणूकदार बसले आहेत. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवार, ४ मे रोजी जाहीर होणार आहेत. या निकालांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे. परंतू, या दिवशी नेमकी परिस्थिती काय असेल याचा कोणालाच अंदाज नाहीय.
हे खरे आहे की, पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला, तर शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळू शकते. केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पाँडीचेरीमध्येही जर विद्यमान सरकारांची पुनरावृत्ती झाली, तर गुंतवणूकदार याला 'राजकीय स्थिरता' म्हणून स्वीकारतील. याचा फायदा शेअर बाजाराला होणार आहे, असे कोटक या ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. परंतू, जगावर घोंघावत असलेले कच्च्या तेलाचे संकट याच दिवशी या शेअर बाजाराच्या फुग्याला टाचणी देखील लावू शकते, असा सावधानतेचा इशारा देखील दिला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती ठरू शकतात अडथळा
ब्रोकरेजने गुंतवणूकदारांना सावध देखील केले आहे. ही संभाव्य तेजी जास्त काळ टिकणार नाही, कारण कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सर्वात मोठा धोका आहेत. निवडणूक निकालानंतर सरकारचे लक्ष ऊर्जा सब्सिडी, मान्सूनची अनिश्चितता आणि वाढती महागाई रोखण्यावर असेल. यामुळे बाजार पुन्हा दबावाखाली येऊ शकतो.
पुढील १० महिने 'रिफॉर्म्स'चा काळ
या निवडणुकांनंतर पुढील १० महिने कोणतेही मोठे मतदान नसल्यामुळे, सरकार काही कडक आर्थिक निर्णय घेऊ शकते. यामध्ये प्रामुख्याने अनुदानाबाबत मोठा निर्णय घेणे, भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम रूप देणे आणि राजकीय कारणांमुळे रखडलेल्या आर्थिक सुधारणांना गती देणे. यामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे.
बाजाराची सद्यस्थिती
गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स ५८२ अंकांनी घसरून ७६,९१३ वर, तर निफ्टी १८० अंकांनी घसरून २३,९९७ वर बंद झाला. गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने बाजारात ही घसरण झाली होती. आता सर्वांचे लक्ष ४ मे च्या निकालांकडे लागले आहे.
