अनुदानावर बियाणे मिळवा, 'महाडीबीटी'वर अर्ज केला तर खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 18:09 IST2026-05-07T17:44:48+5:302026-05-07T18:09:24+5:30

खरीप हंगाम २०२६साठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बी-बियाणे अनुदान योजना जाहीर केली असून, या योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

खरीप हंगाम २०२६साठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बी-बियाणे अनुदान योजना जाहीर केली असून, या योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

या पिकांना अनुदान : सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि भुईमूग या प्रमुख खरीप पिकांसाठी अनुदान लागू आहे. बियाण्याच्या प्रकारानुसार व वर्गवारीनुसार अनुदानाचा दर ठरतो. काही योजनांतर्गत ठरावीक घटकांवर ५० ते १०० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य : या योजनेत 'पहिले अर्ज, पहिले प्राधान्य' या तत्त्वावर लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे विलंब न करता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे उशिरा अर्ज केल्यास अनुदान मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते.

योजनेचे पात्रता व निकष : जमिनीची नोंद, पिकाची निवड, आवश्यक कागदपत्रे आणि इतर निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. महाडीबीटीवर सक्रिय नोंदणी, फार्मर आयडी, आधार लिंक बँक खाते आणि वैध ७/१२ उतारा अनिवार्य आहे.

काय आहे बियाणे अनुदान ? : कृषी विभागामार्फत ही योजना राबवली जाते. उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि इतर राज्य पुरस्कृत योजनांचा समावेश शासनाकडून करण्यात आला आहे.