“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 20:12 IST2026-05-07T20:10:33+5:302026-05-07T20:12:16+5:30
West Bengal Border News:बांगलादेशने सीमावर्ती भागातील सुमारे १०२ किमी अंतरावरील सुरक्षेत मोठी वाढ केली आहे.

“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
West Bengal Border News: पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा झालेला ऐतिहासिक विजय आणि आसाममध्ये भाजपाने मारलेली विजयाची हॅटट्रिक यामुळे बांगलादेश सतर्क झाला आहे. बांगलादेश सैन्याने नागरिकांना सीमावर्ती भागात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. तसेच सीमावर्ती भागातील सुमारे १०२ किमी अंतरावरील सुरक्षेत मोठी वाढ केली आहे.
भारताच्या सीमेवरील दोन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या विजयानंतर बांगलादेशने सीमेवरील दक्षता वाढवली आहे. बॉर्डर गार्ड बांगलादेशने जशोरमधील बेनापोल सीमा चौकीवर बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे. या दोन राज्यांमध्ये भाजपाच्या विजयानंतर अवैध घुसखोरांना बांगलादेशमध्ये परत पाठवले जाऊ शकते, अशी भीती बांगलादेशला वाटत असल्याचे काही रिपोर्ट सांगत आहेत.
गस्त आणि चोवीस तास पाळतही वाढवण्यात आली
जशोर-४९ बीजीबी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल गुलाम मोहम्मद सैफुल आलम खान यांनी सांगितले की, सर्व प्रकारची घुसखोरी आणि सीमापार गुन्हे रोखण्यासाठी दल हाय अलर्टवर आहे. रघुनाथपूर, शिकारपूर, सादीपूर, घिबा, पुतखाली, गोगा, दौलतपूर आणि बेनापोलमधील रुद्रपूर यासह अनेक सीमावर्ती चौक्यांवर अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. या भागांमध्ये गस्त आणि चोवीस तास पाळतही वाढवण्यात आली आहे.
सीमेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे
बांगलादेशी अधिकाऱ्यांनी लोकांना सीमावर्ती भागाजवळ, विशेषतः रात्रीच्या वेळी, अनावश्यक हालचाल न करण्याचा इशारा दिला आहे. कर्नल गुलाम मोहम्मद म्हणाले की, भारतातून कोणीही घुसखोर बांगलादेशात प्रवेश करू नये, हे सुनिश्चित करण्यासाठी सीमेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अतिरिक्त गस्तीची व्यवस्थाही अधिक मजबूत करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, निवडणुकांनंतर पश्चिम बंगालमधील परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, चापैनवाबगंजमधील १४० किलोमीटर लांबीच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. ५३ व्या बीजीबी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल काझी मुस्तफिजुर रहमान यांनी सांगितले की, भारताचे सीमा सुरक्षा दल कोणालाही बेकायदेशीरपणे बांगलादेशात घुसवू नये, हे सुनिश्चित करण्यासाठी बीजीबी कडक नजर ठेवून आहे. सीमेवर गस्त आणि गुप्तचर कारवाया तीव्र करण्यात आल्या असून, स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती वगळता 'झिरो लाईन' (सीमा रेषा) जवळील हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.