पृथ्वीचा अंत जवळ? शतकाच्या अखेरीस भयंकर प्रलय येणार; अनेक देश उद्ध्वस्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 10:12 AM2021-11-04T10:12:20+5:302021-11-04T10:17:00+5:30

हवामान बदलाचे गंभीर परिणाम भोगावे लागणार; शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा

गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढलं आहे. दुष्काळ, महापूर, भूस्खलनाच्या घटनांमध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. त्यातच आता शास्त्रज्ञांनी पुढील धोका सांगितला आहे.

विज्ञानाशी संबंधित अहवाल प्रकाशित करणारं जगातील सर्वात मोठं मासिक नेचरनं नुकतंच एक सर्वेक्षण केलं. त्यामध्ये आयपीसीसीचा हवामान अहवाल तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचा समावेश होता. या शास्त्रज्ञांनी वातावरणात होत असलेल्या बदलांवरून धोक्याचा इशारा दिला आहे.

जागतिक तापमान वाढीचा वेग पाहता २१०० पर्यंत पृथ्वीवर भयंकर बदल होतील आणि ते प्रलयांपेक्षा कमी नसतील, असा धोक्याचा इशारा शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे. आयपीसीसीचा हवामान अहवाल जगातील २३४ शास्त्रत्रांनी मिळून तयार केला आहे.

जग वेगानं बदलत आहे. गरजा बदलत आहेत. प्रदूषण, उष्णता वाढत आहे. यामुळे जगणं अवघड होणार आहे. पर्जन्यमान बदलत असल्यानं पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. येत्या काही वर्षांत यामुळे भयावह परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज कोलंबियातील एँटीकोईया विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि संशोधक पाओला एरियास यांनी वर्तवला.

जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राची पाणी पातळी वाढत आहे. जागतिक स्तरावरील नेते याबद्दल अधिक सक्रियपणे काम करत असल्याचं वाटत नाही. त्यांचं काम अतिशय कूर्मगतीनं सुरू आहे. या गतीनं पृथ्वीला वाचवता येणार नाही, असं एरियास म्हणाल्या.

नैसर्गिक आपत्तींमुळे लोकांना मोठ्या संख्येनं स्थलांतरित व्हावं लागत आहे. आयपीसीसीचा अहवाल पाहिल्यास पृथ्वीला वाचवण्यासाठी माणसांकडे फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही, याकडेही एरियास यांनी लक्ष वेधलं.

गेल्या महिन्यात हवामानाबद्दल अहवाल करणाऱ्या २३४ शास्त्रज्ञांपैकी ९२ जणांनी नेचरच्या सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेतला. २१०० पर्यंत पृथ्वीवर इतकी संकटं येतील की त्यात अनेक देश उद्ध्वस्त होतील, असा धोक्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

अवकाळी पाऊस, अचानक होणारी ढगफुटी, त्सुनामी, तापमान वाढ, पूर, दुष्काळ यांच्यामुळे माणूस त्रस्त होईल. या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचं तापमान ३ सेल्सिअसनं वाढेल. पॅरिस करारात निश्चित करण्यात आलेल्या दीड ते दोन सेल्सिअसपेक्षा ही तापमानवाढ अधिक असेल, असं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्के शास्त्रज्ञांनी सांगितलं.

जागतिक तापमानवाढीमुळे प्रलय येईल, अशी भीती ८८ टक्के शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. हवामानातील बदलांचे परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागतील.

Read in English