Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 20:07 IST2026-04-30T20:06:33+5:302026-04-30T20:07:13+5:30
Today's Chanakya West Bengal Exit Poll 2026 : यावेळी, राज्यात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान झाले. बंगाली मतदार उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडला. दोन टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत ९२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. आता सर्वांचे लक्ष लागले आहे, ते ४ मे रोजी येणाऱ्या निकालांकडे.

Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
संंपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चीमबंगाल विधानसभा निवडणुकीचे एक्झिटपोल येत आहेत. बहुतांश पोलमध्ये भाजप सत्तेवर येण्याचा आणि ममतांची खुर्ची जाण्याचा अंंदाज वर्तवला जात आहे. यातच आता 'टुडेज चाणक्या'च्या (Today's Chanakya) एक्झिट पोलनेही राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पोलमध्ये बंगालमध्ये भाजपला १९२, तृणमूलला अर्थात TMC ला १०० तर इतरांना २ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यावेळी, राज्यात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान झाले. बंगाली मतदार उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडला. दोन टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत ९२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. आता सर्वांचे लक्ष लागले आहे, ते ४ मे रोजी येणाऱ्या निकालांकडे.
तृणमूलची घसरगुंडी, भाजपला 'प्रचंड' बहुमत -
'टुडेज चाणक्या'च्या सर्वेक्षणाचा विचार करता, या निवडणुकीत भाजपला तब्बल ४८ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तर तृणमूलला ३८ टक्के आणि इतरांना १४ टक्के मते मिळताना दिसत आहेत. या निवडणुकीत दलित आणि ओबीसी मतदारांनी भाजपला मोठी साथ दिल्याचेही बोलले जात आहे.
ममता दिदींंसाठी महत्वाचा निवडणूक -
राजकीय दृष्ट्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जात आहे. गेली १५ वर्षे सत्तेत असूनही त्यांना आपला राजकीय बालेकिल्ला राखण्यासाठीही संघर्ष करावा लागला.
महत्वाचे म्हणजे, भाजपसाठी पश्चिम बंगाल जिंकणे, हे एक 'वैचारिक लक्ष्य' मानले जाते. भाजपने २०११ मधील ४ टक्क्यांवरून २०१९ मध्ये तब्बल ४० टक्के मतांपर्यंत मजल मारली. यानंतर २०२१ मध्ये भाजडपने ७७ जागा जिंकल्या आणि तृणमूलसमोर मुख्य विरोधक बनला.
एक्झिट पोलवर काय म्हणाल्या ममता दिदी? -
एक्झिट पोल संदर्भात प्रतिक्रिया देताना ममता म्हणाल्या, "हे आकडे केवळ तृणमूलच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी जाहीर करण्यात आले असून बनावट आहेत. भाजपच्या कार्यालयातून आले आहेत. तसेच, तृणमूल काँग्रेस २९४ पैकी २२६ पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.