"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 17:19 IST2026-04-30T17:18:42+5:302026-04-30T17:19:26+5:30
"येत्या काळात महाविकास आघाडीतले हे तीन पक्ष एकमेकांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत"

"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. यासाठी भाजपने पाच, शिंदेसेनेने दोन, दोन्ही राष्ट्रवादीने एक-एक तर उद्धवसेनेने एक उमेदवार दिला. ९ जागांसाठी महायुतीने जास्तीचा उमेदवार न दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. पण याआधी महाविकास आघाडीकडून उमेदवार ठरवताना बराच गोंधळ पाहायला मिळाला. यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली. "वाट्याला आलेल्या विधान परिषदेच्या केवळ एका जागेचा निर्णय घेताना नाकीनऊ आलेल्या महाविकास आघाडीची कॉमेडी सर्कस पाहून या आघाडीला घरी बसवल्याबद्दल महाराष्ट्रातील जनता आनंदी आणि समाधानी आहे. विधान परिषदेच्या जागेवर नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची हे कळत नाही त्यांनी महाराष्ट्र कसा चालवला असता, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आहे", अशा शब्दात भाजपा प्रदेश नवनाथ बन यांनी मविआची खिल्ली उडवली.
"महाविकास आघाडीत विधान परिषदेची एकच जागा निवडून येणार आहे. परंतु या एका जागेसाठी महाविकास आघाडीचे जवळपास ५०० लोक इच्छुक असताना उद्धव ठाकरेंनी परस्पर अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. आपला एक गट उद्धव ठाकरेंच्या विरोधात सक्रिय करून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला की तुम्ही विधान परिषद लढली तर तुमचा पराभव होईल. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा राजकीय बळी न देता अंबादास दानवे यांना राजकीय बळी देण्यासाठी त्यांना पुढे केले. त्यामुळे महाविकास आघाडीमधील तीन तिघाडा आणि काम बिघाडा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. येत्या काळात महाविकास आघाडीतले हे तीन पक्ष एकमेकांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत", असे बन यांनी सांगितले.
"अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे नाहीत तर फक्त आणि फक्त उबाठा गटाचे उमेदवार आहेत. आता अंबादास दानवे यांना किती मते पडतील, काँग्रेसने उमेदवार दिला तर किती मते पडतील आणि महायुतीने जादा उमेदवार दिला तर तुमची काय अवस्था होईल, हे पहा. महायुतीही यासंदर्भात योग्यवेळी योग्य निर्णय घेईल. अंबादास दानवे यांचा राजकीय बळी या निमित्ताने उद्धवजी ठाकरे यांनी घेतला एवढेच मला सांगायचे आहे," असे ही बन म्हणाले.