धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 21:13 IST2026-04-30T21:12:35+5:302026-04-30T21:13:13+5:30
आम्ही सांगितलेल्या १० माणसांची आणि १० वस्तूंची ओळख त्यांनी पटविली तर त्यांना ८० लाखांचे बक्षिस देऊन मी अंधश्रद्धा निमुर्लनाचे काम बंद करून त्यांचा शिष्य बणून काम करेन, असे वक्तव्य अनिसचे संस्थापक, राष्ट्रीय संघटक प्रा. शाम मानव यांनी आज भरगच्च पत्रकार परिषदेत केले.

धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धिरेंद्र कृष्ण महाराज (बागेश्वर धाम) यांना संरक्षण आहे. त्यांना कसली भिती नाही. त्यामुळे त्यांनी नागपूरच्या पत्रकार संघात येऊन अ. भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेले आव्हान स्विकारावे. आम्ही सांगितलेल्या १० माणसांची आणि १० वस्तूंची ओळख त्यांनी पटविली तर त्यांना ८० लाखांचे बक्षिस देऊन मी अंधश्रद्धा निमुर्लनाचे काम बंद करून त्यांचा शिष्य बणून काम करेन, असे वक्तव्य अनिसचे संस्थापक, राष्ट्रीय संघटक प्रा. शाम मानव यांनी आज भरगच्च पत्रकार परिषदेत केले.
आम्ही दिलेले आव्हान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी स्विकारल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. मात्र, त्यांनी आव्हान न स्विकारता पळ काढला आहे, हे सांगण्यासाठी आज ही पत्रपरिषद घेतल्याचेही मानव यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या सोबत अनिसचे राष्ट्रीय महासचिव हरिश देशमुख, ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे आणि अन्य पदाधिकारी होते.
प्रा. मानव म्हणाले, धीरेंद्र शास्त्री हे मोठे ठगबाज आहे. ते स्वत:त दिव्य, चमत्कारिक आणि अलाैकिक शक्ती असल्याचा दावा करतात. कोणत्याही माणसाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर सांगण्याचे दावे करतात. त्यांना अनिसने आव्हान दिले आहे, त्यांनी नागपूरच्या पत्रकार संघात यावे. येथे कोर्ट स्टॅम्प पेपरवर त्यांनी आव्हान स्विकारल्याचे लिहून द्या. त्यानंतर
आम्ही १० वेगवेगळ्या व्यक्ती समोर करू. त्यांच्या आधारकार्ड नुसार, त्यांचे, वडिलांचे नाव, वय आणि मोबाईलनंबर सिलबंद लिफाफ्यात ठेवून तो लिफाफा पंचाच्या (समिती)समोर सुरक्षित ठेवला जाईल. दोन्ही गटाच्या संमतीने पंच निवडले जातील. बाजुच्या रूममध्ये १० वस्तू ठेवल्या जातील. धीरेंद्र महाराज यांनी त्यांच्या कथित दिव्यशक्तीद्वारे या १० व्यक्ती आणि वस्तूंबाबत लिखित माहिती द्यावी. ५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा ही प्रक्रिया पार पडेल आणि दोन्ही वेळा ९० टक्के खरी माहिती दिली तर त्यांच्या दाव्यात सच्चाई असल्याचे मान्य करून त्यांना ८० लाखांचे बक्षिस दिले जाईल, असेही प्रा. मानव म्हणाले.
२०२३ मध्येच कायद्याच्या कचाट्यात; मात्र...
राजकीय पाठबळ असल्यामुळेच धीरेंद्र शास्त्रीची ठगबाजी सुरू आहे. अन्यथा २०२३ मध्येच ते कायद्याच्या कचाट्यात आले असते, असे सांगून प्रा. मानव यांनी धीरेंद्र महाराज आणि अशोक खरात यांच्यात साम्य असल्याचा सनसनाटी आरोप केला. बाबा तेथे बाया, असतातच, हे अनेकदा पुढे आले आहे. धीरेंद्र महाराजबाबतही असेच पुढे येणार, यात शंका नसल्याचेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक राजकीय नेते आणि बाबा-बुवांचे संबंध तसेच जादुटोणा कायद्यासंबंधाने किस्से सांगितले.