पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:54 IST2026-04-30T14:53:35+5:302026-04-30T14:54:28+5:30
West Bengal Election Voting Percentage : बंगाल विधानसभा निवडणूक २०२६: मतदानाचा ऐतिहासिक टक्का कोणाच्या फायद्याचा? ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली. पहा सविस्तर राजकीय विश्लेषण.

पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर एक अत्यंत धक्कादायक आणि अभूतपूर्व चित्र समोर आले आहे. राज्याच्या मतदार यादीतून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे ५१ लाख मतदारांची नावे कमी झाली असतानाही, प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ३० लाखांची वाढ झाली आहे. या विसंगत ट्रेंडमुळे बंगालमधील मतदानाचा टक्का ऐतिहासिक पातळीवर पोहोचला असून, देशातील विधानसभा निवडणुकांमधील हा आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम ठरला आहे.
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या टप्प्यात रात्री १२ वाजेपर्यंत ९२.६३% मतदान नोंदवले गेले. दोन्ही टप्प्यांची सरासरी काढल्यास हा आकडा ९२.९३% वर पोहोचला आहे. भारताच्या निवडणूक इतिहासात कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत झालेली ही सर्वाधिक वोटिंग आहे.
अतिरिक्त ३० लाख मतदार कोणाचे?
तज्ज्ञांच्या मते, यावेळी असे मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत जे सामान्यतः मतदानापासून दूर राहतात. वाढलेल्या ३० लाख मतांपैकी २१ लाख मते पहिल्याच टप्प्यात पडली. सरासरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०,००० अधिक मते पडली आहेत. पहिल्या टप्प्यातील जागांवर ही सरासरी प्रति सीट १४,२३७ इतकी मोठी आहे.
सत्ताविरोधी लाट की सत्ताधाऱ्यांचे समर्थन?
साधारणपणे, अधिक मतदान हे 'सत्ताविरोधी लाटे'चे प्रतीक मानले जाते. २०११ मध्ये ८४.३३% मतदान झाले होते, तेव्हा डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता संपली होती. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे की, गेल्या काही निवडणुकांत अधिक मतदान होऊनही जनतेने सत्ताधारी पक्षालाच साथ दिली आहे.
एक्झिट पोल काय सांगतात...
पश्चिम बंगालवर सात वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. यापैकी पाच एक्झिट पोल हे भाजपची सत्ता येण्याचा कल दर्शवितात तर दोन ममता बॅनर्जींची सत्ता पुन्हा येणार असल्याचे दर्शवित आहेत. यामुळे भाजपच्या गोटात मोठा उत्साह दिसत आहे. असे असले तरी येत्या ४ मे रोजी दुपारपर्यंत सारेकाही स्पष्ट होणार आहे.