राज ठाकरेंची 'मन की बात' मुख्यमंत्री ऐकणार? मनसेप्रमुखांनी थेट शरद पवारांना फोन केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 01:36 PM2021-03-08T13:36:30+5:302021-03-08T13:46:22+5:30

Nanar Oil Refinery Project: मनसेप्रमुख राज ठाकरेंना शरद पवारांसोबत फोनवरून संवाद; नाणार प्रकल्पावरून घडामोडींना वेग

कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी प्रकल्पाचं समर्थन केलं.

कोरोना काळात अनेकांचे रोजगार संकटात आले. गुंतवणुकीबद्दल प्रश्न उपस्थित झाले. अशा परिस्थितीत तेल शुद्धीकरण हातातून जाणं योग्य ठरणार नाही, अशा आशयाचं पत्र राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नाणार प्रश्नी पत्र लिहिलं आहे. यानंतर आज नाणार प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्या स्थानिकांनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली.

राज ठाकरेंनी आज नाणारच्या रहिवाशांसोबत तेल शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात चर्चा केली. शरद पवारांसोबत फोनवरून चर्चा झाल्याची आणि त्यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन केल्याची माहिती यावेळी राज यांनी दिली.

मी नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असं शरद पवार यांनी सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे राज ठाकरेंची मन की बात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या माध्यमातून ऐकणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. काल राज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा प्रकल्पाला असलेला ठाम विरोध बोलून दाखवला. त्यामुळे शरद पवार मुख्यमंत्र्यांचं मन वळवणार का, शिवसेनेचा विरोध मावळणार का, अशी चर्चा रंगली आहे.

आमचे हे एक काम मार्गी लावा. आम्ही तुमचे काय ऋणी राहू, अशी भावना नाणारवासीयांनी राज ठाकरेंकडे व्यक्त केली. त्यावेळीच राज यांनी शरद पवारांशी फोनवरून संवाद झाल्याचं सांगितलं.

राज ठाकरेंनी नाणारप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. यापैकी फडणवीस यांची भूमिका आधीपासूनच प्रकल्पाच्या बाजूनं राहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी राज यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.

शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणानं बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचंही ते म्हणाले.

शिवसेनेनं मात्र राज ठाकरेंच्या पत्रानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. नाणार होऊ देणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या राज यांचं मतपरिवर्तन नेमकं कशामुळे झालं, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला.