सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:30 IST2026-04-29T14:29:51+5:302026-04-29T14:30:16+5:30
Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेची लाट कायम असून अकोला, अमरावतीत तापमान ४५ अंशांवर गेले आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज.

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
राज्यात सध्या उन्हाचा कडाका असह्य झाला असून विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला, वर्धा आणि अमरावती या शहरांमध्ये तापमानाने ४५ अंशांची ओलांडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, या भीषण उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता असून, १ मे रोजी राज्यात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मंगळवारी उत्तर प्रदेशातील बांदा (४५.६°C) हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले, तर महाराष्ट्रातील अकोला आणि अमरावतीमध्येही पारा ४५ अंशांच्या पुढे होता. उष्णतेची ही लाट इतकी भीषण आहे की, राजस्थानमध्ये धावत्या ट्रेनच्या ब्रेक पॅडलने उष्णतेमुळे पेट घेतल्याची घटना घडली आहे.
पाऊस कधी येणार?
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार:
३० एप्रिल: देशातील मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये धुळीच्या वादळाची शक्यता आहे.
१ मे (महाराष्ट्र दिन): महाराष्ट्रासाठी हा दिवस दिलासादायक ठरू शकतो. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन
उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, १ मे रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने झाडांखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली आश्रय घेऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
देशातील १० राज्यांत 'हाय अलर्ट'
महाराष्ट्रात १ मे रोजी पावसाची शक्यता असली, तरी त्यापूर्वी ३० एप्रिल रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान वेगाने बदलणार आहे. हवामान विभागाने दिलेला राज्यानुसार अंदाज खालीलप्रमाणे आहे:
गारपीट आणि वादळ (ओलावृष्टी): छत्तीसगड आणि झारखंडमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान होऊ शकते.
विजांचा कडकडाट : मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि दिल्लीमध्ये विजांच्या कडकडाटासह धुळीच्या वादळाची शक्यता आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वेगाचे वारे: बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो.
उकाडा कायम: ओडिशाच्या काही भागात हवामान ढगाळ असले तरी तिथे दमट आणि उष्ण हवामानाचा त्रास जाणवेल.