"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:53 IST2026-04-29T14:52:16+5:302026-04-29T14:53:12+5:30
Congress Slams Rajnath Singh SCO Statement: राजनाथ सिंहांचे विधान देशविरोधी; काँग्रेसचा पाकिस्तानला क्लीन चिट दिल्याचा आरोप

"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिश्केक येथील शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत केलेल्या एका विधानावरून देशात मोठे राजकीय युद्ध पेटले आहे. "दहशतवादाला कोणताही धर्म आणि देश नसतो," या राजनाथ सिंह यांच्या विधानाचा काँग्रेसने तीव्र निषेध केला असून, हे विधान 'देशविरोधी' असल्याचे म्हटले आहे.
संरक्षण मंत्री किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. तेव्हा त्यांनी "दहशतवादाला कोणताही देश नसतो, कोणताही धर्म नसतो आणि त्याचे समर्थन करणारे कोणतेही तत्त्वज्ञान नसते", असे म्हटले होते.
'ऑपरेशन सिंदूर'ची जगभरात चर्चा
आपल्या भाषणादरम्यान राजनाथ सिंह यांनी 'ऑपरेशन सिंदूर' चा विशेष उल्लेख केला. भारताने आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कशा प्रकारे धोरणात्मक पावले उचलली आहेत, याचे उदाहरण त्यांनी जगासमोर मांडले. कोणत्याही स्वरूपातील दहशतवाद हा मानवतेसाठी कलंक असून तो खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जे देश दहशतवादाचा वापर आपल्या परराष्ट्र धोरणाचे हत्यार म्हणून करतात, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तरदायी ठरवले पाहिजे. दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक मदत आणि सुरक्षित आश्रयस्थाने उद्ध्वस्त करण्यासाठी SCO सदस्य देशांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसचा 'क्लीन चिट'चा आरोप
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. "दहशतवादाला देश नसतो, असे म्हणून संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला एक प्रकारे 'क्लीन चिट' दिली आहे. पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र आहे हे संपूर्ण जगाला ठाऊक असताना, अशा मंचावर असे विधान करणे म्हणजे भारताच्या भूमिकेला कमकुवत करणे आहे," असा आरोप रमेश यांनी केला आहे.
पंतप्रधानांच्या धोरणांवरही टीका
काँग्रेसने याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'तुष्टीकरण' आणि 'शरणागती' धोरणाचा भाग म्हटले आहे. अमेरिकेचे तुष्टीकरण आणि चीनसमोर केलेली शरणागती यामुळेच भारत पाकिस्तानबाबत आपली भूमिका मवाळ करत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. २०२० मध्ये चीनला दिलेल्या 'क्लीन चिट'प्रमाणेच आता पाकिस्तानलाही वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.