आयपीएल २०२६ च्या मैदानात सध्या एका अशा व्यक्तीची चर्चा रंगली आहे, ज्याचा भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहलीशी अत्यंत खास आणि जुना संबंध आहे. २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता, त्याच संघातील हुकमी एक्का असलेला वेगवान गोलंदाज अजितेश अर्गल आता आयपीएलमध्ये अंपायर म्हणून मैदानात उतरला आहे.
दरम्यान, २७ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान हे दोन्ही जुने मित्र पुन्हा एकदा आमनेसामने आले. विराट कोहली फलंदाजी करत असताना अजितेश अर्गल मैदानावर पंच म्हणून जबाबदारी पार पाडत होता. सामना संपल्यानंतर विराटने आपल्या या जुन्या सहकाऱ्याची गळाभेट घेतली, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
अजितेश अर्गल यांचा प्रवास
- मलेशियात झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजितेशने ५ षटकांत केवळ ७ धावा देत २ बळी घेतले होते. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे भारताने विश्वचषक उंचावला. या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अजितेशला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.
- विश्वचषकानंतर अजितेशला आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने (आताचे पंजाब किंग्स) करारबद्ध केले होते. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने बडोद्याकडून १० प्रथम श्रेणी सामने खेळले, पण दुखापती आणि खराब फॉर्ममुळे २०१३ मध्ये त्याने क्रिकेटला रामराम ठोकला.
- क्रिकेट सोडल्यानंतर त्याने आयटी विभागात नोकरी केली. मात्र क्रिकेटची ओढ कायम असल्याने त्याने बीसीसीआयच्या पंच परीक्षेची तयारी केली. २०२३ मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि महिला प्रीमियर लीग मध्ये पंच म्हणून काम केले.
आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत
अजितेश अर्गलने आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यातून आयपीएलमध्ये पंच म्हणून काम सुरू केले. त्यानंतर दिल्ली विरुद्ध पंजाब आणि आता दिल्ली विरुद्ध आरसीबी अशा सामन्यांत त्याने पंच म्हणून यशस्वी कामगिरी केली. एकेकाळी आपल्या कर्णधारासाठी मैदानात विकेट्स घेणारा हा खेळाडू, आज त्याच कर्णधाराच्या सामन्यात पंचाची भूमिका बजावत आहे, हा योगायोग क्रिकेट चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.