मुंबईतील वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्सच्या संघ २४४ धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरला. गोलंदाजांच्या खराब कामगिरीशिवाय या सामन्यात एकाच खेळाडूनं क्षेत्ररक्षणावेळी केलेल्या तीन चूका मुंबई इंडियन्सला पराभवाच्या खाईत घेऊन गेल्या. यंदाच्या हंगामात जो ट्रॅविस हेड सातत्याने धावांसाठी संघर्ष करताना दिसला त्याने मोठ्या धावंसख्येचा पाठलाग करताना ३० चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ७६ धावांची स्फोटक खेळी करत सामना SRH च्या बाजूनं सेट केला. त्याच्या खेळीला नमन धीरनं एक नव्हे तर तीन झेल सोडून हातभार लावला. याची किंमत मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभवाच्या रुपात मोजावी लागली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नमन धीरचं ढिसाळ क्षेत्ररक्षण, ट्रॅविस हेडनं उचलला फायदा
सामन्याच्या सुरुवातीलाच ट्रेंट बोल्ट घेऊन आलेल्या तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हेडनं बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेन फटका मारला. नमन धीरला झेल पकडता आला नाही. चेंडू हातातून निसटून सीमारेषेबाहेर गेला आणि हेडसह सनरायझर्सच्या खात्यात सहा धावा जमा झाल्या. यानंतर पाचव्या षटकात अल्लाह गझनफरच्या गोलंदाजीवरही धीरने आणखी एक झेल सोडला. ऑफ स्टंपबाहेरील चेंडूवर मिळालेली संधीही त्याला साधता आली नाही. चुका इथेच थांबल्या नाहीत. अश्वनी कुमारच्या षटकात त्याने पुन्हा एकदा हेडला जीवनदान दिलं. या संधीचं सोन करत ट्रॅविस हेडनं अवघ्या २० चेंडूत यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले.
पांड्यासह नीता अंबानी आणि अकाश अंबानींचा चेहरा पडला
नमन धीरच्या क्षेत्ररक्षणातील चुका MI ला चांगल्याच महागात पडल्या. कर्णधार हार्दिक पांड्यासह वानखेडेच्या स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी उपस्थितीत असलेल्या नीता अंबानी आणि अकाश अंबानी यांचा चेहराही पडल्याचे पाहायला मिळाले. IPL मध्ये २०० पारच्या लढाईत मुंबईचा रेकॉर्ड तगडा आहे. याआधी फक्त एकदाच मुंबई इंडियन्सच्या संघाने २०० धावा करून पराभवाचा सामना करावा लागला होता. पण क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांवर चुका आणि गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे मोठी धावसंख्या उभारूनही MI वर पराभवाची नामुष्की ओढावली. ८ सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाने फक्त २ विजय मिळवले असून प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आता त्यांना प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे.