धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 01:07 IST2026-04-30T01:06:12+5:302026-04-30T01:07:20+5:30
जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही अधिक गंभीर असल्याने त्यांना इंदूरला हलवण्यात आले आहे.

धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
मध्य प्रदेशातील धार येथे बुधवारी भीषण अपघात झाला. चिकलिया फाटा येथे मजुरांनी भरलेली एक पिकअप अनियंत्रित होऊन उलटली आणि समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडकली. या भीषण अपघातात १२ मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर १५ हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही अधिक गंभीर असल्याने त्यांना इंदूरला हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धार जिल्ह्यातील बग्गड येथून मजुरी करून सुमारे ३५ मजूर पिकअप वाहनाने आपल्या घरी परतत होते. याच वेळी चिकलिया फाट्याजवळ त्यांच्या पिकअप वाहनाचा टायर फाटला. यामुळे वाहन अनियंत्रित झाले आणि तीन-चार वेळा उलटून दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला गेले आणि समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओला जोरात धडकले. या धडकेनंतर घटनास्थळी मजुरांचा एकच आक्रोश सुरू झाला.
मृत मजूर तिरला भागातील सेमलिया, नयापुरा, जलोखिया आणि सुलतानपूर येथील असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी जिल्हाधिकारी अभिषेक चौधरी आणि डीआयजी मयंक अवस्थी यांनी पोलीस दलासह घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची पाहणी केली. तिरला पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ३५ जणांना रुग्णालयात आणले होते, त्यापैकी १२ जणांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती डॉ. छत्रपाल सिंह यांनी दिली आहे.