ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 22:03 IST2026-04-29T22:02:05+5:302026-04-29T22:03:34+5:30
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांच्या फरकाने पराभव होईल, असा दावा केला आहे. तसेच भाजपला किती जागा मिळतील? यासंदर्भातही मोठी भविष्यवाणी केली आहे.

ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आज थांबली. आज येथे दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यापूर्वी, २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात १५२ जागांवर मतदान झाले होते. महत्वाचे म्हणजे, किरकोळ घटना वगळता, यावेळी येथे हिंसाचार दिसून आला नाही. लोक उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडले आणि त्यांनी विक्रमी मतदान केले. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या टप्प्यात ९१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. यानंतर आता, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांच्या फरकाने पराभव होईल, असा दावा केला आहे. तसेच भाजपला किती जागा मिळतील? यासंदर्भातही मोठी भविष्यवाणी केली आहे.
काय म्हणाले सुवेंदू अधिकारी? -
मतदानानंतर प्रतिक्रिया देताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, "राज्यातील जनतेने परिवर्तनासाठी मतदान केले आहे. हिंदू मतदारांनी पहिल्यांदाच उघडपणे बाहेर पडत मतदान केले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. ममता बॅनर्जी यांनी दिवसभर केंद्रीय सुरक्षा दलांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. गुजराती-मारवाडी वस्तीत गुंडांच्या मदतीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला."
एवढेच नाही तर, "भवानीपूरमध्ये आपण २० हजार मतांनी जिंकत आहोत ८ पैकी ७ वॉर्डांत आपली आघाडी असेल आणि भाजप १८० पेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करेल," असे भाकितही त्यांनी केले.
"ही निवडणूक बंगालला 'पश्चिम बांगलादेश' होण्यापासून रोखण्यासाठी होती" -
पश्चिम बंगाल निवडणुकीसंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य म्हणाले, "बंगालच्या जनतेने अशी निवडणूक कधीच बघितली नाही. ते अतिशय उत्साहाने या निवडणुकीत सहभागी झाले होते. ही निवडणूक कुणाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी, कुण्या पक्षाला सत्तेबाहेर करण्यासाठी अथवा कुण्या पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी नव्हती, तर ही निवडणूक बंगालला 'पश्चिम बांगलादेश' होण्यापासून रोखण्यासाठी होती. हा हिंदू बंगाली आणि राष्ट्रवादी मुस्लिमांच्या अस्तित्वाचा लढा होता."
तसेच, "निवडणूक संपुष्टात आली आहे. अद्याप कसल्याही प्रकारच्या जीवीत अथवा वित्त हाणीचे वृत्त नाही. अशा प्रकारे निवडणूक पार पडणे, आमच्यासाठी एक मोठा मुद्दा आहे. तृणमूल काँग्रेस सत्तेबार जाणे निश्चित आहे," असेही भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.