"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:36 IST2026-04-29T12:34:30+5:302026-04-29T12:36:12+5:30
Dhirendra Shastri vs Shyam Manav : नागपूरच्या रामकथेत धीरेंद्र शास्त्रींनी श्याम मानव यांचे आव्हान स्वीकारले. ३० तारखेपर्यंत नागपुरातच असल्याचे सांगत त्यांनी अंनिसला सडेतोड उत्तर दिले आहे. वाचा सविस्तर.

"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
नागपूर: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या रामकथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी श्याम मानव यांचे आव्हान स्वीकारत त्यांना प्रत्यूत्तर दिले आहे. "कुणाला काही ** असेल तर त्यांनी समोर यावे," अशा कडक शब्दांत शास्त्रींनी प्रतिआव्हान दिले असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले, "मी सध्या पाच दिवस इथेच (नागपुरात) आहे, मध्य प्रदेशात नाही. ही रामकथा सुरू आहे, हा प्रदेश त्यांचा आहे आणि मंचही त्यांचाच आहे. माझ्याकडे जी विद्या किंवा शक्ती आहे, तिचे मी सादरीकरण देणार. मी कोणताही जादूगार नाही, तर ईश्वराच्या प्रेरणेने लोकांना मार्गदर्शन करतो."
"३० तारखेला निघून जाईन, मग..."
शास्त्रींनी श्याम मानव यांना टोला लगावताना म्हटले की, "दोन दिवस माझा दरबार भरणार आहे. ज्यांना शंका आहे त्यांनी यावे, जेणेकरून त्यांची आणि आमची झंझट कायमची संपेल. मी ३० तारखेला इथून निघून जाणार आहे, त्यानंतर मी पळून गेलो असा आरोप करू नका."
वादाची पार्श्वभूमी...
अंनिसचे श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना नागपुरात त्यांचे 'चमत्कार' सिद्ध करून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण केल्यास ८० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. धीरेंद्र शास्त्री नागपूर सोडून गेल्याची चर्चा रंगली असतानाच, त्यांनी आता मंचावरून हे आक्रमक विधान केले आहे.