ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:12 IST2026-04-29T11:12:38+5:302026-04-29T11:12:47+5:30
३.२१ कोटी मतदार करणार फैसला, मतदानाचा हा दुसरा टप्पा राज्याची राजकीय दिशा ठरवणारा आहे.

ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान उद्या, बुधवारी पार पडणार आहे. या टप्प्यात राज्यातील १४२ जागांचे भवितव्य ठरणार असून, हा निकाल केवळ आमदारच निवडणार नाही, तर सत्ता कोणाची येणार हे देखील स्पष्ट करणार आहे.
तृणमूल काँग्रेस आपला दक्षिण बंगालचा बालेकिल्ला राखणार की भाजपला 'नबन्न' (सचिवालय) पर्यंतचा रस्ता सापडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात १५२ मतदारसंघांत ९३ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे मतदानाचा हा दुसरा टप्पा राज्याची राजकीय दिशा ठरवणारा आहे.
येथे होणार मतदान
या टप्प्यात उत्तर-२४ परगणामध्ये ३३ जागा, दक्षिण-२४ परगणातील ३१, हावडातील १६, नदिया १७, हुगळी १८ व पूर्व बर्धमानमधील १६ कोलकात्यातील ११ जागांचा समावेश आहे.
द. बंगाल: सत्तेचा मुख्य मार्ग
राजकीय समीक्षकांनुसार, दक्षिण बंगाल जिंकल्याशिवाय बंगालची सत्ता मिळवणे अशक्य आहे. २०२१ च्या निवडणुकीत या १४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने १२३ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ १८ जागा मिळाल्या होत्या.
३.२१ कोटी मतदार
दुसऱ्या टप्प्यात आज ३.२१ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात १.६४ कोटी पुरुष व १.५७ कोटी महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८-१९ वर्षांचे ४.१२ लाख नवमतदार यंदा मतदान करतील. राज्यात सोमवारी सायंकाळी प्रचार थंडावला असला तरी राजकारण तापलेले आहे.
मतदार यादीतील नावे वगळण्यावरून वाद
या निवडणुकीत 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन'मुळे मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आली आहेत, जो चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. ज्यामुळे निकालात मोठी उलथापालथ होऊ शकते.
प्रचारातील मुख्य मुद्दे
भ्रष्टाचार, घुसखोरी, निवडणूक पश्चात हिंसाचार आणि महिला सुरक्षा या मुद्द्यांवर भाजपने आक्रमक प्रचार केला. गृहमंत्री अमित शाह यांनी मतदानानंतर ६० दिवस केंद्रीय दले बंगालमध्येच राहतील, असे आश्वासन सोमवारी मतदारांना दिले आहे.