Vinayak Mete Accident: विनायक मेटे अपघात: उदयनराजेंनी वर्मावर बोट ठेवले; सांगितली एक्स्प्रेस वेवरील मोठी चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 11:28 AM2022-08-14T11:28:02+5:302022-08-14T11:35:31+5:30

Udayanraje Bhosale on Vinayak Mete accident: विनायक मेटेंच्या एसयुव्ही कारला अपघात कसा झाला, यावर तर्कवितर्क लढविले जात असताना पोलिसांच्या प्राथमिक तपासात काही बाबी समोर आल्या आहेत.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. यानंतर पनेवलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेत्यांनी उपस्थिती लावली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आदी नेत्यांनी विनायक मेटेंचे अंत्यदर्शन घेतले. याचबरोबर उदयनराजे यांनी देखील एमजीएम हॉस्पिटलला भेट देऊन मेटे कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी उदयनराजेंनी एक्स्प्रेस वेवर नेहमीच होणारी मोठी चूक लक्षात आणून दिली. विनायक मेटेंच्या एसयुव्ही कारला अपघात कसा झाला, यावर तर्कवितर्क लढविले जात असताना पोलिसांच्या प्राथमिक तपासात काही बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये मेटे यांचा ड्रायव्हर लेन चेंज करत होता, तितक्यातच पुढे जात असलेला ट्रक देखील लेन चेंज करत होता, यामुळे मेटे यांच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार ट्रकवर आदळली, असे समोर आले आहे.

वाहतूक डिपार्टमेंटला सूचना करावी वाटते. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. ट्रक कोणत्याही लेनमधून घुसत असतात. तिसऱ्या लेनमध्ये ट्रक चालकांना वाहन चालविण्याची परवानगी असते. परंतू हे ट्रकचालक दुसऱ्या आणि पहिल्या लेनमधून अवजड वाहने चालवितात. यामुळे हे अपघात होत आहेत, असा आरोप उदयनराजेंनी केला.

याचबरोबर अपघात झाला तर त्या प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. एखादा व्यक्ती आतमध्ये अडकला तर तातडीने कटरने दरवाजा, बिम कापून त्याला बाहेर काढण्यासाठी यंत्रणा अपलब्ध नसते. ही यंत्रणा उपलब्ध झाली तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो, असे उदयनराजे म्हणाले. तर संभाजीराजेंनी हायवेचे कंत्राट असलेल्यांनी ट्रॉमा हॉस्पिटल उभारलेली नाहीत. यामुळे अनेकांचे जीव जात असल्याचे म्हटले आहे.

एक्स्प्रेस वेवर वाहतुकीच्या नियमांचे कठोर पालन केले जावे. ट्रक चालकांवर कारवाई करावी, वाहतूक पोलिसांनी यावर लक्ष ठेवावे. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, अशी वाहतूक झाली पाहिजे. वेगाने कोणी जात असल्यास त्यावरही कारवाई केली जावी. ठिकठिकाणी अॅम्बुलन्स, रेस्क्यू वाहने, पोलीस आदी उपलब्ध असावेत, असे उदयनराजे म्हणाले.

विनायक मेटे यांचे अपघाती निधन हे दुर्देवी घटना आहे. महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी नेहमी भाग घेतलेला आहे. त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. रस्त्यात अपघात होतात त्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडतात. भारतीय नागरिकांनी आता संवेदनशील बनायला हवं. या अपघाताचा नेमकं कारण मला माहीत नाही. मात्र संपूर्ण भारताला अपघात मुक्त करणे हीच विनायक मेटे यांना वाहलेली खरी श्रद्धांजली असेल, असे नितीन गडकरी म्हणाले.