भाजपाला खिंडार पाडण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; महाराष्ट्रात राजकीय भूकंप?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 07:20 PM2021-09-18T19:20:32+5:302021-09-18T19:25:13+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात केलेल्या आजी-माजी आणि भावी सहकारी अशा उल्लेखाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच रंगू लागलं आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानानंत विविध चर्चांना उधाण आलं नेमकं आगामी काळात राज्यात कुठली राजकीय घडामोड घडणार का? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

यातच भारतीय जनता पार्टीचे(BJP) काही आमदार सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. न्यूज १८ लोकमतं हे वृत्त दिलं आहे. येत्या काही दिवसांत राज्यात भाजपाचे आमदार सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(NCP Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. भाजपाला खिंडार पाडण्याच्या तयारीत महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन पक्ष आहेत.

भाजपाच्या काही आमदारांचा पुढील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच काही आमदार शिवसेनेत जाणार आहेत. त्यासाठी दोन्ही सत्ताधारी पक्षांनी मोठी रणनीती आखल्याचं कळतंय.

स्थानिक राजकीय गणितानुसार, भाजपाचे आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र हे आमदार कोण? याचा खुलासा अद्याप झाला नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर याचे संकेत दिले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, कुणीतरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, असे सूचक विधान केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठावाड्यातील कार्यक्रमात जे वक्तव्य केले आहेत, ते ठाकरे शैलीत केले आहे. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी युती होईल असे कोणतीही वक्तव्य केले नाही असा दावा त्यांनी केला.

पिंपरी चिंचवड जवळील देहूगावमधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. सूत्रसंचालकाने दोन-तीनवेळा चंद्रकांत पाटील यांना माजी मंत्री असे संबोधले. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मागे वळून, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं विधान केले होते.

तसेच ज्यांना भावी सहकारी व्हायचे आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत, असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. राजकारणात ज्या हालचाली दिसतायात विषेशतः चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाबाबात त्या हालचाली आहेत. कोणी तरी आहे तिथे त्यांना इथे यायचंय त्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी संकेत दिले आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख ‘भावी सहकारी’ असा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेलाही उधाण आले होते.

राज्यात एकामागोएक सुरु असलेल्या राजकीय नेत्यांच्या भविष्यवाणीमुळे नेमकं आगामी काळात कुठला राजकीय भूकंप पाहायला मिळणार? महाविकास आघाडीचे नेते भाजपाला धक्का देणार की भाजपा या तिन्ही पक्षाचं सरकार गुंडाळण्यात यशस्वी होणार हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल.