Krunal Pandya Bhuvneshwar Kumar, RCB vs GT 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुरुवारी गुजरात टायटन्सकडून चार गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवादरम्यान एक आश्चर्यकारक घडामोड घडली. बंगळुरूने सामन्यात केवळ चार गोलंदाजांचा वापर केला. विशेष म्हणजे, फॉर्मात असलेल्या कृणाल पांड्याला एकही षटक टाकण्यास दिले नाही. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने कृणाल पांड्याला गोलंदाजी न देण्यामागील कारण स्पष्ट केले. पण ते कारण फारच विचित्र आणि अजब वाटले.
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही?
बंगळुरूच्या संघाने १५५ धावा केल्या होत्या. त्यानंतर गुजरातच्या संघाने तुफान फलंदाजी केली. अवघ्या १५.५ षटकात गुजरात टायटन्सने ६ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या आणि सामना जिंकला. या सामन्यात कृणाल पांड्याला एकही षटक दिले नाही. सामना संपल्यानंतर भुवनेश्वर कुमारने कृणाल पांड्याला गोलंदाजी न देण्यामागील कारण स्पष्ट केले. भुवी म्हणाला, "कृणाल पांड्याला गोलंदाजी न देणे हा एक रणनीतिबद्ध निर्णय होता. तुम्ही सामना पाहिल्यास, खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल होती. त्यामुळे फिरकी गोलंदाज संघात आहेत म्हणून त्यांना गोलंदाजी देणे योग्य नाही. जर फिरकी गोलंदाजीला मदत मिळत असती, तर आम्ही त्याला नक्कीच गोलंदाजी दिली असती."
कृणालला नकार, सुयशला गोलंदाजी का?
कृणाल पांड्याला गोलंदाजी देण्यात आली नाही कारण खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करत नव्हती, तर सुयश शर्माला गोलंदाजी का देण्यात आली? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याला ३.५ षटके देण्यात आली आणि त्याने ४४ धावा दिल्या. सुयश हा देखील फिरकी गोलंदाज आहे. त्यामुळे त्याला षटके देण्यात आली तर कृणाल पांड्यालाही षटक द्यायला हवे होते.
हंगामात घेतलेत ९ बळी
विशेष म्हणजे, कृणालने या हंगामात खूप चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने या हंगामात ९ सामन्यांमध्ये ९ बळी घेतले आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट प्रति षटक केवळ ८.८ धावा आहे. कृणाल इतर फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगळा आहे. तो विरोधी संघाला आश्चर्यचकित करण्यासाठी बाउन्सरसुद्धा टाकतो. जर त्याला संधी दिली असती, तर त्याने गुजरात टायटन्सला धक्का दिला असता. अशा परिस्थितीत त्याच्याबद्दल घेतलेला निर्णय प्रश्नांच्या घेऱ्यात आला आहे.