Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 19:50 IST2026-05-01T19:49:57+5:302026-05-01T19:50:19+5:30
Untold Tourism Spot : मोबाईल नेटवर्क आणि रस्ते नसलेल्या या गावात पर्यटक ट्रेकिंगसाठी का जातात?

Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
राजस्थानचे एकमेव हिल स्टेशन असलेल्या माउंट आबूमध्ये एक असे गाव आहे, जिथे पोहोचल्यावर तुमचा मोबाईल केवळ कॅमेरा म्हणून उरतो. गुरुशिखरच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले 'शेरगाव' हे आधुनिक जगाच्या कोलाहलापासून पूर्णपणे अलिप्त आहे. मोबाईल सिग्नलचा मागमूसही नसलेले हे गाव आजही महाराणा प्रताप यांच्या शौर्याचा आणि भक्तीचा साक्षीदार म्हणून उभे आहे. आधुनिक सुविधांचा अभाव हीच या गावाची खरी ओळख आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
४००० फूट उंचीवर वसलेले साधेपण
समुद्रसपाटीपासून सुमारे ४००० फूट उंचीवर वसलेल्या शेरगाव आणि उतरज या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी आजही पक्का रस्ता नाही. माउंट आबूपासून १२ किमी अंतरावर असलेल्या गुरुशिखरपर्यंत आल्यानंतर पुढे डोंगराळ वाटांनी पायी ट्रेकिंग करतच या गावांत जावे लागते. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे लोक इथे 'डिजिटल डिटॉक्स'साठी येतात. शहराच्या गोंधळापासून लांब, शांतता शोधणाऱ्या पर्यकांसाठी हे राजस्थानमधील सर्वात उत्तम ठिकाण ठरत आहे.
महाराणा प्रतापांचा अज्ञातवास आणि प्राचीन शिवलिंग
शेरगावला ऐतिहासिक महत्त्वही मोठे आहे. लोकमान्यतेनुसार, हळदीघाटीच्या युद्धानंतर महाराणा प्रताप यांनी आपला काही काळ या दुर्गम भागात अज्ञातवासात घालवला होता. याच काळात त्यांनी येथे एका शिवलिंगाची स्थापना केली होती. आजही ते प्राचीन शिवलिंग आणि शिवमंदिर या भागात श्रद्धेचे केंद्र आहे. याशिवाय ईशान्य भेरू मंदिर आणि भेरू गुफा पाहण्यासाठी अनेक भाविक आणि दुर्गप्रेमी कठीण चढाई करून येथे पोहोचतात.
ट्रेकिंग आणि व्हिलेज टुरिझमचे केंद्र
शेरगाव आता 'विलेज टुरिझम'चे प्रमुख केंद्र बनत आहे. साधारण २५० लोकसंख्या असलेल्या या गावात आजही पारंपरिक कच्ची घरे पाहायला मिळतात. गुरुशिखरपासून ४ किमी पायी चालल्यानंतर 'उतरज' गाव लागते, जिथे केदारनाथ आणि बद्रीनाथची मंदिरे आहेत. तिथून पुढे ८ किमीची अत्यंत आव्हानात्मक चढाई केल्यानंतर 'शेरगाव' लागते. हे अंतर पार करणे म्हणजे शारीरिक क्षमतेची परीक्षाच असते.
पर्यटकांसाठी खास टिप्स
मार्गदर्शक सोबत ठेवा: डोंगराळ भागात रस्ता भटकण्याची भीती असते, त्यामुळे स्थानिक गाईड सोबत घेणे सुरक्षित ठरते.
शिधा सोबत न्या: इथे संसाधनांची कमतरता असल्याने स्वतःचे जेवण आणि पाणी सोबत ठेवणे सोयीचे पडते.
सर्वोत्तम वेळ: पावसाळा आणि हिवाळा हा काळ शेरगाव भेटीसाठी सर्वोत्तम आहे. उन्हाळ्यात येथे पाण्याची टंचाई आणि डिहायड्रेशनचा धोका असतो.
फिटनेस: ज्यांना चालण्याचा त्रास आहे किंवा जे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाहीत, त्यांनी हा ट्रेक टाळलेलाच बरा.
मोबाईलच्या रिंगटोनऐवजी पक्षांचा किलबिलाट आणि वाऱ्याचा आवाज ऐकायचा असेल, तर शेरगावला नक्की भेट द्यायला हवी.