माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 18:57 IST2026-05-01T18:55:20+5:302026-05-01T18:57:04+5:30
मुरादाबादमध्ये एका हैवान पतीने पत्नीला १२ वर्षे सिगरेटचे चटके देऊन छळ केला आणि नंतर तिला घटस्फोट दिला.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून घरगुती हिंसेची एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल. एका महिलेला तिच्याच घरात तब्बल १२ वर्षे नरकयातना भोगाव्या लागल्या. दारू आणि जुगाराच्या आहारी गेलेला पती पत्नीला मारहाण तर करायचाच, पण त्याही पुढे जाऊन तो तिच्या शरीराचे विविध भाग पेटत्या सिगरेटने डागत असे. या क्रूरतेची सीमा इथेच संपली नाही, तर पतीने पत्नीला बेकायदेशीररीत्या तीन तलाक देऊन घराबाहेर हाकलून दिले आहे.
लग्नानंतर सुरू झाला छळाचा खेळ
पीडित महिला फरहा परवीन हिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे लग्न १२ वर्षांपूर्वी मुगलपुरा येथील बिलाल याच्याशी झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतरच बिलालचे खरे रूप समोर आले. त्याला दारू आणि जुगाराचे व्यसन जडले होते. जुगारात पैसे हरले किंवा नशेची धुंदी चढली की, त्याचा संपूर्ण राग तो फरहावर काढत असे. फरहाने सांगितले की, बिलाल तिला केवळ बेदम मारहाणच करायचा नाही, तर रागाच्या भरात पेटती सिगरेट तिच्या अंगावर लावून तिला भाजत असे. मुलांच्या भविष्यासाठी आणि समाजाच्या भीतीने फरहाने हे सर्व मुकाट्याने सोसले.
मध्यरात्री घरात घुसून केली मारहाण
या अत्याचाराचा कळस २६ एप्रिलच्या रात्री झाला. रात्री ११.१५च्या सुमारास आरोपी बिलाल फरहाच्या मावशीच्या घरात जबरदस्तीने घुसला, जिथे फरहा सध्या राहत होती. तिथे त्याने फरहाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याच वादादरम्यान त्याने फरहाला बेकायदेशीररीत्या 'तीन तलाक' दिला आणि पुन्हा दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांची कठोर कारवाई
न्याय मिळवण्यासाठी फरहाने अखेर नागफनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिची व्यथा ऐकून पोलीसही चक्रावून गेले. मुरादाबाद पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी बिलालविरुद्ध मारहाण, छळ आणि 'मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा'च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. "आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडितेच्या शरीरावरील जखमांची चौकशी केली जात आहे. लवकरच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.