Gurjit Kaur: हॉकीसाठी शेतकऱ्याच्या लेकीने सोडलं होतं घर, आज देशाला मिळवून दिला ऐतिहासिक विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:36 PM2021-08-02T14:36:23+5:302021-08-02T14:40:32+5:30

Gurjit Kaur, Tokyo Olympics Updates: आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर १-० ने मात केली. या लढतीत भारताकडून एकमेव गोल हा गुरजीत कौर हिने केला. त्याबरोबरच गुरजीतचे नाव भारतीय हॉकीच्या इतिहासात कायमचं नोंदवलं गेलं आहे.

भारतीय महिला हॉकी संघाने टोकियोमध्ये ऐतिहासिक यश मिळवताना पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर १-० ने मात केली. या लढतीत भारताकडून एकमेव गोल हा गुरजीत कौर हिने केला. त्याबरोबरच गुरजीतचे नाव भारतीय हॉकीच्या इतिहासात कायमचं नोंदवलं गेलं आहे.

पंजाबमधील एका शेतकऱ्याची लेक असलेल्या गुरजीत कौर हिची कहाणी रोमांचक आहे. तिचे वडील सतनाम सिंग हे शेतकरी आहेत. ते गुरजीत आणि तिची मोठी बहीण प्रदीप कौर यांना सायकलवरून शाळेत घेऊन जात असत. त्यानंतर त्यांनी दोन्ही मुलींना घरापासून ७० किमी दूर असलेल्या तरन तारन येथील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन्ही बहिणींनी हॉकीमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी २००६ मध्ये घर सोडले.

२५ वर्षांच्या गुरजीत कौर यांनी पहिल्यांदा २०१४ मध्ये तिला भारतीय संघाच्या नॅशनल कॅम्पमध्ये स्थान मिळाले. मात्र तिला २०१७ मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेमध्ये गुरजीत कौर हिने भारताकडून सर्वाधिक ८ गोल केले. या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकून विश्वचषक स्पर्धेसाठी क्वालिफाय केले होते.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेल्या विजयानंतर गुरजीत कौर हिने सांगितले की, हे अनेक वर्षांपासून केलेल्या मेहनतीचे फळ आहे. तिने सांगितले की, आम्ही दीर्घकाळापासून मेहनत घेत होतो. आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण आम्ही पहिल्यांदाच सेमी फायनलला गेलो आहोत. आता आम्ही पुढच्या सामन्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आम्हाला सर्वांचा पाठिंबा मिळत आहे.

भारतीय महिला हॉकी संघाच्या ऑलिम्पिकमधील अभियानाची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्या तीन सामन्यांत भारताला नेदरलँड, जर्मनी आणि ब्रिटनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय महिला संघाने आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

उपांत्यपूर्व लढतीत भारताने ऑस्ट्रेलियावर १-० ने मात करत उपांत्य फेरी गाठली. आता उपांत्य फेरीत ४ ऑगस्ट रोजी भारताचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. अर्जेंटिनाने जर्मनीवर मात करत उपांत्य फेरी गाठली आहे.