ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:44 IST2026-05-05T14:42:56+5:302026-05-05T14:44:38+5:30
Mamata Banerjee Politics: ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून पराभूत. बंगालमध्ये भाजपचे सरकार. आता ममता बॅनर्जींची पुढची राजकीय चाल काय?

ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
गेली १५ वर्षे पश्चिम बंगालच्या राजकारणात एकछत्री अंमल गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी २०२६ चे निकाल 'राजकीय भूकंप' ठरले आहेत. ज्या भवानीपूर मतदारसंघाने ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवले, त्याच पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा १५,१०५ मतांनी पराभव केला. गेल्या दोन निवडणुकांत ममतांचा सुवेंदू यांनी केलेला हा दुसरा पराभव आहे.
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
ममता गेल्या निवडणुकीत नंदीग्राममधून सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात उभ्या ठाकल्या होत्या. तिथे त्यांचा पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि ममतांच्या भवानीपूरमधून देखील निवडणूक लढविली होती. या दोन्ही ठिकाणी सुवेंदू अधिकारी मताधिक्याने निवडून आले आहेत. ममतांकडे आता सत्ता नाही तसेच आमदारकी देखील नाही यामुळे त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळणार नाही. यामुळे ममता पुढे काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच ममतांकडे विधानसभेवर निवडून जाऊन विरोधी पक्षनेता बनण्याची संधी आहे.
पोटनिवडणुकीद्वारे पुनरागमन...
सुवेंदू अधिकारी दोन जागांवरून निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. अशा रिक्त होणाऱ्या जागेवरून ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवू शकतात. जर त्या निवडून आल्या, तर विधानसभेत 'विरोधी पक्षनेता' म्हणून त्या भाजप सरकारला धारेवर धरू शकतील. आता सुवेंदू अधिकारी कोणत्या मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा देतात यावर सारे अवलंबून असणार आहे. त्याचप्रमाणे, हुमायून कबीर हे रेजीनगर आणि नौदा या दोन मतदारसंघांतून निवडून आले आहेत. त्यांनाही एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल.
ममतांसमोर आव्हान : पक्षाला फुटीपासून वाचवणे
सत्ता गेल्यानंतर अनेकदा आमदार पक्षांतर करतात. ८१ आमदारांचे संख्याबळ राखणे आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची फेररचना करणे ही ममतांसमोरची सर्वात मोठी अग्निपरीक्षा असेल.
'विरोधकांची योद्धा'?
ममता बॅनर्जी या उपजतच 'फायटर' नेत्या आहेत. १९८४ मध्ये त्यांनी सोमनाथ चॅटर्जींसारख्या दिग्गज नेत्याला हरवून आपली कारकीर्द सुरू केली होती. आता पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. विधानसभेबाहेर राहून रस्त्यावरची लढाई लढण्यात ममता वाकबगार आहेत, त्यामुळे बंगालमध्ये त्या 'विरोधकांची योद्धा' म्हणून कशा प्रकारे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.