राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 05:19 IST2026-05-06T05:18:46+5:302026-05-06T05:19:33+5:30
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जनादेश लुटला; आयोगाने भाजपसाठी काम केले; मतमोजणीत गैरव्यवहाराचे ममतांचे गंभीर आरोप

राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
कोलकाता : विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा देण्यास पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी स्पष्ट नकार दिला. मी राजीनामा देणार नाही. कारण, हा निकाल जनतेचा खरा कौल नसून, एका कटकारस्थानाचा परिणाम असल्याचा दावा त्यांनी केला.
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा सामना भाजपशी नव्हता, तर भाजपसाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाशी होता, असा आरोप बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्या म्हणाल्या, माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आम्हाला जनतेच्या कौलामुळे नव्हे, तर कटकारस्थानामुळे पराभव पत्करावा लागला... मी हरले नाही, मी लोक भवनात जाणार नाही. ते घटनात्मक नियमांनुसार कारवाई करू शकतात.
तथ्यशोधन समितीची घोषणा
निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या घटनांची पाहणी करण्यासाठी १० सदस्यीय तथ्यशोधन समिती स्थापन करण्याची घोषणा बॅनर्जी यांनी केली. या समितीमार्फत “निवडणुकीनंतर हिंसाचारग्रस्त” भागांचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मी हरलेली नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी लाेकभवनात जाणार नाही.
ममता बॅनर्जी, मावळत्या मुख्यमंत्री काय लागला निकाल? : २९४ सदस्यीय विधानसभेत भाजपने २०७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले.
निवडणुकीनंतर हिंसा : तृणमूलचा आरोप; भाजपने आरोप फेटाळले
पश्चिम बंगालमध्ये अनेक भागांत सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या अनेक कार्यालयांना आग लावण्यात आली आणि त्यांची तोडफोड करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते राज्यात मिळालेल्या प्रचंड विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसले. तृणमूल काँग्रेसने या हिंसाचारात भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला. हे आराेप भाजपने फेटाळले.
मतमोजणीवर प्रश्नचिन्ह
मतमोजणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सुमारे १०० जागांवरील जनादेश लुटला असा दावा करत, पक्षाचे मनोबल खच्ची करण्यासाठी मतमोजणी जाणीवपूर्वक हळूहळू केली. याने इतिहासात एक काळा अध्याय लिहिला गेला, असेही ममता ठामपणे म्हणाल्या.
‘इंडिया’आघाडी सोबत’
बॅनर्जी निवडणूक निकालानंतर विरोधी ‘इंडिया’ आघाडीतील अनेक नेत्यांनी संपर्क साधून पाठिंबा दिल्याचे सांगितले. आघाडीतील नेत्यांनी मला फोन करून एकजूट दर्शवली. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनीही माझ्याशी संवाद साधला. आता राष्ट्रीय स्तरावर विरोधी आघाडी मजबूत करण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमित शाह ठरविणार बंगालचा सीएम, सुवेंदू अधिकारींचे नाव चर्चेत
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधिमंडळ पक्षनेता अर्थात मुख्यमंत्री निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नियुक्ती केली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण मांझी बंगालसाठी सह-निरीक्षक असतील.
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुवेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर आहे. प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, तसेच राज्यात महिला मुख्यमंत्री करायची असेल तर रूपा गांगुली व अग्निमित्रा पॉल यांच्या नावांची चर्चा आहे.