“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 23:16 IST2026-05-05T23:16:16+5:302026-05-05T23:16:29+5:30
West Bengal Election 2026 Result: पश्चिम बंगालमधील भाजपा विजयाची कीर्ती अमेरिकेत पोहोचली असून, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले.

“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
West Bengal Election 2026 Result: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला तब्बल २०६ जागा मिळाल्या. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाच्या या विजयाची चर्चा जगभरात होत असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनीही पंतप्रधान मोदी यांना या ऐतिहासिक विजयाबाबत शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.
पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजपप्रणित रालोआशासित राज्यांची संख्या २२ वर पोहचली आहे. त्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळाल्यामुळे भाजपासाठी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पश्चिम बंगालमधील विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरन मांझी यांना सह-पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
असा नेता लाभला आहे, हे भारताचे भाग्य आहे
व्हाइट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांचे त्यांच्या ऐतिहासिक आणि निर्णायक निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. गेल्याच महिन्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आणि म्हटले होते की, भारताला असा नेता लाभला आहे, हे भारताचे भाग्य आहे, असेही व्हाइट हाऊसने नमूद करत सांगितले.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील भाजपाचा विजय हा दीर्घकाळ तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या पश्चिम बंगालसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यातील पहिला विजय आहे. या निवडणुकीच्या निकालांमुळे ममता बॅनर्जींच्या १५ वर्षांच्या राजवटीचा अंत झाला असून, पंतप्रधान मोदींसाठी हे एक मोठे राजकीय यश मानले जात आहे.