“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 19:30 IST2026-05-05T19:30:57+5:302026-05-05T19:30:57+5:30
Manoj Jarange Patil On West Bengal Election 2026 Result: राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासह आता मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपाच्या विजयावर शंका घेतली आहे.

“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
Manoj Jarange Patil On West Bengal Election 2026 Result: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला तब्बल २०६ जागा मिळाल्या. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १५ हजार १०५ मतांनी ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना एकूण ७३ हजार ९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८ हजार ८१२ मतांवर समाधान मानावे लागले. या निकालावरून इंडिया आघाडीसह विरोधक भाजपा तसेच केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. यातच आता महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनीही याबाबत शंका उपस्थित केली आहे.
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळाल्यामुळे पक्षासाठी मुख्यमंत्रिपदाचा निर्मय महत्त्वाचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पश्चिम बंगालमधील विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरन मांझी यांना सह-पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले.
ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही
ज्याला विचारले तो म्हणतो की, मी यांना मतदान केले नाही, तरी हे जिंकतात. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींना पाडले, पण लोक म्हणतात ममतादीदी कधीच पडणार नाही. मला पहिल्यांदा वाटायचे काही नसेल पण आता नक्की काहीतरी भानगड आहे, त्यांनी कुठेतरी काड्या खोचून ठेवल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. भाजपाच्या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. आता, मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपाच्या विजयावर शंका घेतली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. हे असले रत्न आपल्याला लाभले आहेत, हे गुंडांना जेलमध्ये एसी लावून देतात आणि मोबाईल फोन देतात. यांच्या काळात गुंडांचे चालणार आहे. हे सरकार राक्षसी वृत्तीचे असून आता ते आपटावेच लागेल, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.