TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:56 IST2026-05-05T18:51:30+5:302026-05-05T18:56:42+5:30
बंगालचे क्रीडा राज्यमंत्री आणि माजी क्रिकेटर मनोज तिवारींंचे पक्षावर गंभीर आरोप!

TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
West Bengal Assembly Election 2026 : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मनोज तिवारी यांनी मंगळवारी पक्षाला रामराम ठोकला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पक्षावर गंभीर आरोप करत, तिकीटासाठी मोठ्या रकमेची मागणी होत असल्याचा दावाही केला आहे.
तिकीटासाठी ५ कोटींची मागणी
मनोज तिवारी यांनी आरोप केला की, या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी मोठी रक्कम दिली. ज्यांच्याकडे भरपूर पैसा होता, त्यांनाच तिकीट मिळाले. यावेळी किमान ७० ते ७२ उमेदवारांनी प्रत्येकी सुमारे ५ कोटी रुपये दिले. माझ्याकडूनही पैसे मागण्यात आले, पण मी नकार दिला, असे तिवारी म्हणाले.
मंत्रीपदावरही नाराजी
तिवारी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्री होते. मात्र, त्यांनी मंत्रीपदाबाबत नाराजी व्यक्त करत ते केवळ “नावापुरते” असल्याचे सांगितले. राज्यमंत्रीपद म्हणजे फक्त एक ‘लॉलीपॉप’ होते. कोणत्याही बैठकीत आमच्या मतांना महत्त्व दिले जात नसे, असा आरोपही त्यांनी केला.
शिबपूर मतदारसंघाचा मुद्दा
तिवारी यांनी २०२१ मध्ये हावड्यातील शिबपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, यावेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्या मते, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळेच पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही.
पक्षातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह
तिवारी यांनी TMC मध्ये अंतर्गत लोकशाही नसल्याचा आरोपही केला. मी बैठकीत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, तर मध्येच थांबवले जायचे. ‘माझ्याकडे वेळ नाही’ असे सांगितले जायचे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, हावडा जिल्ह्यातील ड्रेनेज आणि सांडपाणी व्यवस्थेच्या समस्येकडेही लक्ष वेधले. मी वारंवार प्रयत्न करूनही या समस्यांचे निराकरण झाले नाही. स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला.