पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 20:52 IST2026-05-05T20:52:29+5:302026-05-05T20:52:53+5:30
Assembly Election 2026: पश्चिम बंगाल, आसाम निवडणुका झाल्यानंतर आता भाजपा पुढील तयारी लागली असून, मित्रपक्षांसोबतचा वाद काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते, असे म्हटले जात आहे.

पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
Assembly Election 2026:पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली. पश्चिम बंगालमध्येभाजपाला तब्बल २०६ जागा मिळाल्या. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. आसाम येथेही भाजपाने विजयाची लय कायम ठेवली. आता भाजपा पुढील तयारीला लागल्याचे सांगितले जात असून, भाजपाने जे टार्गेट सेट केले आहे, त्यामुळे काँग्रेसच्या चिंतेत भर पडू शकते, असे म्हटले जात आहे.
पश्चिम बंगालच्या विजयानंतर भाजपप्रणित रालोआशासित राज्यांची संख्या २२ वर पोहचली आहे. त्यामुळे भाजपाची ताकद वाढली आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सरकार स्थापन करण्याच्या तयारीत भाजपा आहे. ९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे. यामुळे आता झारखंड हे पूर्व भारतातील भाजपा सरकार नसलेले एकमेव राज्य ठरणार आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसचा जवळपास पूर्णपणे सफाया झाला आहे. परिणामी, काँग्रेसवर पुन्हा सत्तेत येण्याचा दबाव वाढला आहे. भाजपाविरुद्ध लढताना सत्ता टिकवणे हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासमोर एक मोठे आव्हान असेल.
झारखंडला चारही बाजूंनी भाजपाचा वेढा!
झारखंडच्या शेजारील राज्ये बिहार, छत्तीसगड आणि ओडिशा यांच्या पाठोपाठ आता भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन केले आहे. आतापर्यंत झारखंड आणि पश्चिम बंगाल या पूर्व भारतातील राज्यांमध्ये भाजपा किंवा एनडीएचे सरकार नव्हते. मात्र, आता पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. याचा परिणाम झारखंड निवडणुकांवर होईल, असे म्हटले जात आहे. या नव्या राजकीय परिस्थितीत हेमंत सोरेन सरकारवर दबाव वाढला आहे. हेमंत सोरेन यांचे अलीकडील दिल्ली दौरे, आघाडीतील अंतर्गत कुरबुरी आणि केंद्रीय निधी वितरणातील विलंबाच्या तक्रारी यामुळे आता याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडी 'अभेद्य' असल्याचे वारंवार म्हटले असले तरी, पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकांवरून काँग्रेस आणि मित्रपक्षांमधील मतभेद सातत्याने चव्हाट्यावर आलेले पाहायला मिळाले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांचे नेते एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये जेएमएम आणि काँग्रेस पक्ष संगनमताने एकत्रित लढले असते, तर आता चित्र वेगळे पाहायला मिळाले असते, असे म्हटले जात आहे.