दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील संथ खेळपट्टीवर संजू सॅमसन आणि युवा बॅटर कार्तिक शर्माच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला एकतर्फी पराभूत केले. दिल्लीच्या संघाने दिलेल्या १५६ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सनं ८ विकेट्स आणि १५ चेंडू राखून विजय नोंदवला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आपल्या खात्यात १२ गुण जमा करत प्लेऑफ्सची आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी समीकरण आणखी आव्हानात्मक झाले आहे. आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी उर्वरित प्रत्येक सामना 'करो वा मरो'ची लढत असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्सनं राखली दिल्ली कॅपिटल्सची लाज
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय फसवा ठरला. पथुम निसंका १९ (१५), लोकेश राहुल १२ (१३), नितीश राणा १५ (१३) आणि करुण नायर १३ (१३) या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. आपला निर्णय सार्थ ठरवण्यासाठी अक्षर पटेललाही बॅटिंगमध्ये धमक दाखवता आली नाही. संघ अडचणीत असताना ट्रिस्टन स्टब्स ३८ (३१) आणि समीर रिझवीनं शेवटपर्यंत मैदानात थांबतून २४ चेंडूत केलेल्या ४० धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात १५५ धावा केल्या. पण याचा बचाव करताना दिल्लीच्या गोलंदाजांना कमाल दाखवता आली नाही.
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
जिथं दिल्लीकर फलंदाजांनी नांगी टाकली तिथं संजू सॅमसन याने आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवला. कर्णधार ऋतुराज गायकवाड अवघ्या ६ धावा करून परतल्यावर उर्विल पटेलच्या रुपात चेन्नई सुपर किंग्सला दुसरा धक्का बसला. तो ९ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. पण त्यानंतर संजू सॅमसन आणि युवा बॅटर कार्तिक शर्मा जोडी जमली. संजूनं ५२ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ८७ धावांची नाबाद खेळी केली. कार्तिक शर्मानं ३१ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजय निश्चित केला. कार्तिक शर्मानं सलग दुसऱ्या सामन्यात नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. हा युवा चेहरा संघासाठी ट्रम्प कार्ड ठरताना दिसत आहे.